Jalgaon News : दोघांचे एकमेकावर प्रेम, लग्नही केलं मग नेमक काय घडलं ? ‘तिच्या’नंतर काही तासात पतीचाही मृत्यू

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – प्रेमविवाह करून घरी परतलेल्या तरुणीचा सासरी गेल्यानंतर दुसऱ्याच दिवशी संशयास्पदरित्या मृत्यू झाला आहे. जळगाव जिल्ह्यातील पाळधी (ता. धरणगाव) येथे शुक्रवारी (दि. 1) घडली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. दरम्यान, या घटनेला काही तास उलटत नाही तोच त्या तरुणीच्या पतीचा देखील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. विषबाधेमुळे त्यांच्या मृत्यू झाल्याचे समोर येत आहे. मात्र दोघांचे एकमेकांवर प्रेम होते. त्यांनी लग्नही केले होते. मग दोघांनी विष का घेतले असावे? हा प्रश्न आहे. पोलिसांसमोर या प्रकरणाचा उलगडा करण्याचे मोठे आव्हान आहे.

आरती भोसले आणि प्रशांत पाटील (रा. पाळधी) असे मृत्यू झालेल्या नवदाम्पत्याची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पाळधी (ता. धरणगाव) गावातील आरती भोसले व प्रशांत पाटील यांचे एकमेकांवर प्रेम होते. दोघेही काही दिवस बेपत्ता झाले होते. ते थेट विवाह करूनच घरी परतले होते. दोघांच्या पालकांनी पोलिसांसमोर त्यांच्या विवाहाला मान्यता देऊन वाद मिटवला होता. त्यानंतर संसाराला सुरुवात करण्यापूर्वीच आरतीचा संशयास्पद मृत्यू झाला. तिचा घातपात केल्याचा आरोप माहेरच्यांनी केला. मात्र, विषबाधा झाल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. घटनेच्या दिवशी पती प्रशांत पाटील यानेही विषारी औषध प्राशन केले होते. यामुळे त्याची प्रकृतीही खालावली होती. त्याला जळगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. त्याठिकाणी त्याचा मृत्यू झाला.

आरती आणि प्रशांत यांनी दत्त जयंतीच्या दिवशी मंदिरात जावून विवाह केला होता. यावेळी दोघांनीही देवाला साक्षी ठेऊन सोबत जगण्यामरण्याची शपथ घेतली होती. विवाहानंतर अवघ्या तीन-चार दिवसानंतर आरतीचा मृत्यू झाला. तिच्या मृत्यूनंतर अवघ्या चोवीस तासातच प्रशांत याची देखील प्राणज्योत मालवली. वैद्यकीय तपासणीत तिचा मृत्यू विषबाधेने झाल्याचे दिसते. आता तिचा पती प्रशांत याचाही विषबाधेने मृत्यू झाला आहे. दोघांनी विष का घेतले असावे? हा प्रश्न आहे. पोलिसांसमोर या प्रकरणाचा उलगडा करण्याचे मोठे आव्हान आहे.