एफआरपीच्या 14 % वाढीसाठी स्वाभिमानीची लढाई : माजी खासदार शेट्टी

पोलीसनामा ऑनलाईन : यंदाच्या हंगामातील उसाला एकरकमी एफआरपीचा ((FRP) निर्णय झाला असून पहिली उचल विनाकपात द्यावी, ऊस तोडणी वाहतुकीच्या चौदा टक्के वाढीप्रमाणे शेतकऱ्यांचा वाढलेला उत्पादन खर्च गृहीत धरून एफआरपीच्या चौदा टक्क्यांप्रमाणे होणारी सरासरी 200 रुपये शेतकऱ्यांना मिळावेत, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना (Swabhimani Shetkari Sanghatana ) संघर्ष करणार असल्याची घोषणा माजी खासदार राजू शेट्टी (RAJU SHETTY) यांनी सोमवारी येथे झालेल्या ऑनलाईन ऊस परिषदेत केली. राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी मिळावी, यासाठी शेतकऱ्यांच्या सहीची मोहीम राज्यभर राबविणार असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.

जयसिंगपूर-उदगाव ( (जि. कोल्हापूर) मार्गावरील कल्पवृक्ष गार्डनमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेची 19 वी ऊस परिषद ऑनलाईन पद्धतीने झाली. गेल्या तीनवर्षापासून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागत असल्याचे सांगून शेट्टी म्हणाले, शेतकऱ्यांच्या एफआरपीतून चौदा टक्के तोडणी वाहतूक वजा केली जाणार आहे. तोडणी वाहतुकीप्रमाणेच एफआरपीमध्येदेखील चौदा टक्के वाढ करावी. यात एक रुपयाही कमी घेतला जाणार नाही. त्यासाठी गोडाऊनमधून साखरेची वाहतूक होऊ देणार नाही.

ऊस परिषदेत झालेले ठराव
1) ज्या कारखान्यांनी गतवर्षीची एफआरपी दिलेली नाही. त्या साखर कारखान्यांच्या संचालकांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत.
2) लॉकडाऊनच्या काळातील घरगुती वीज बिले विनाअट माफ करावीत.
3) केंद्र सरकारने साखरेची विक्री किंमत 35 रुपये करावी.
4) जागतिक स्तरावर कार्बन क्रेडीटच्या धर्तीवर आपत्ती निवारण निधीची निर्मिती करावी.
5) सन 2020-21 वषार्करीता साखरेचे निर्यात अनुदान प्रतिक्विंटल 15000 रुपये करुन 75 लाख टन साखर निर्यातीस परवानगी द्यावी