‘स्वराज्य रक्षक संभाजी’ मालिका शरद पवारांच्या दबावामुळं बंद होणार नाही, ‘त्या’ पोस्टवर खा. अमोल कोल्हेंचे स्पष्टीकरण

नवी दिल्ली, वृत्तसंस्था – स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेत संभाजी महाराजांची भूमिका साकारणारे अमोल कोल्हे यांची एक पोस्ट व्हायरल होत आहे. शरद पवारांच्या दबावाने संभाजी मालिका बंद केल्याचं या पोस्टमध्ये अमोल कोल्हेंनी म्हटल्याचे व्हायरल होत आहे. यामुळे आता खासदार अमोल कोल्हे संपातले असून त्यांनी ही पोस्ट व्हायरल करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणा केली आहे.

यावर बोलताना अमोल कोल्हे म्हणाले की सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेसंदर्भात बदनामी करण्यात आली असून, आदरणीय पवारसाहेबांना या प्रकरणात गोवण्याचा दुर्दैवी आणि अत्यंत हीन दर्जाचा प्रयत्न होतोय, त्याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे.

पवार साहेबांचा कलाक्षेत्राविषयीचा दृष्टीकोन आपल्या सर्वांनांच ठाऊक आहे. मी राष्ट्रवादीत आल्यापासून पवार साहेबांनी कधीही सांगितलं नाही की हे दाखवा ते दाखवू नका. केवळ वडिलधाऱ्यांच्या भूमिकेतून काही अडचणी तर नाहीत ना ही चौकशी केली. त्यामुळे ज्या बातम्या सोशल मीडियावर फिरत आहेत, त्यात कोणतेही तथ्य नाही.

यावर बोलताना अमोल कोल्हेंनी स्पष्ट केले की, दररोज रात्री 9 वाजता सोमवार ते शनिवार स्वराज्य रक्षक संभाजी मालिका सुरु राहणार आहे. कोणाच्या दबावामुळे मालिका बंद होत आहे या बातम्यामध्ये तथ्य नाही. जे कोणी अशा बातम्या पसरवून सामाजिक तेढ निर्माण करत आहेत अशा उपद्रवी मूल्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी मी महाराष्ट्र पोलिसांकडे करणार आहे. मुख्यमंत्र्यांकडे देखील ही मागणी केलेली आहे. अशा समाजकंटकांना आळा बसला पाहिजे. संभाजी महाराजांचा इतिहास उलगडून दाखवण्यासाठी ही मालिका सुरु असून ती अव्याहतपणे सुरु राहणार आहे.

ही पोस्ट भाजपने व्हायरल केल्याची चर्चा आहे. यावर भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी प्रतिक्रिया दिली. भाजप अशा बनावट क्लिप व्हायरल करत नसते. मालिका बंद करण्यासंदर्भात काही जणांची मते असू शकतात. परंतु भाजप असे काहीही करत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.