‘त्यांचे’गुन्हे मागे घ्या : शरद पवार

पनवेल : पोलीसनामा ऑनलाइन – कळंबोली आणि कामोठ्यातील मराठा समाजाच्या नागरिकांवर मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनावेळी गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत. यामध्ये डॉक्टर, वकील, नोकरदार महिला यांचा समावेश आहे. या वर्गाकडून अशा प्रकारचे गंभीर कृत्य होणे शक्य नाही. त्यामुळे गुन्हे दाखल झालेल्या व्यक्तींची योग्य ती चौकशी होऊन गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार कामोठे येथे एका कार्यक्रमासाठी आले असता, मराठा समाजाच्या वतीने आंदोलनादरम्यान दाखल झालेले गंभीर गुन्हे मागे घेण्यासाठी त्यांना विनंती करण्यात आली होती. या विनंतीवरून शरद पवार यांनी लागलीच २९ डिसेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून हे गुन्हे मागे घेण्याची विनंती केली आहे. गुन्हे दाखल झालेल्या व्यक्तींची यादी त्यांनी सोबत पाठविली असून त्यामध्ये मराठा समाजातील डॉक्टर, वकील, इंजिनीअर आदी सुशिक्षित लोक आहेत. कोणत्याही परिस्थितीत निरपराध व्यक्तीवर गुन्हे दाखल होऊ नयेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी कळंबोली आणि कामोठे येथे मोठा गदारोळ झाला होता. पोलिसांवर दगडफेक होऊन पोलिसांची वाहनेदेखील जाळण्यात आली होती. पोलिस अधिकारी, पोलिस उपायुक्तांची चार ते पाच वाहने जागेवर पेटवून देण्यात आली होती. पनवेल सायन महामार्गावर घडलेल्या या घटनेचे तीव्र पडसाद उमटून त्याला दंगलीचे रूप प्राप्त झाले होते. पोलिसांवर झालेल्या या हल्ल्यामुळे पोलिसांनी जीवे ठार मारण्याचा प्रयत्न, सरकारी कामात अडथळा यांसह दंगलीचे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. एकूण २० हून अधिक तरुणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. सध्या ही मंडळी जामिनावर सुटली असली, तरी यातील अनेक जणांवर नाहक गुन्हे दाखल केल्याचे मराठा समाजाचे म्हणणे आहे.