‘एक मराठा लाख मराठा’ ! ‘तानाजी : द अनसंग वॉरियर’चा ट्रेलर ‘रिलीज’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ‘आधी लगीन कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं’ अशी गर्जना आणि ‘हर मराठा पागल है शिवाजी महाराज का और भगवे का!’ अशा दमदार डायलॉगसह ‘तानाजी : द अनसंग वॉरियर’ चित्रपटाच्या बहुप्रतिक्षित ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला असून प्रेक्षक वर्गाची चित्रपटाबाबतची उत्कंठा वाढली आहे.

शिवाजी महाराजांचा पराक्रमी सरदार म्हणून तानाजी मालुसरेंची ख्याती आहे. या एकनिष्ठ सरदाराची शौर्याची गाथा ‘तानाजी : द अनसंग वॉरियर’ या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये पाहायला मिळतेय. पुरंदरच्या तहात मोगलांना जे किल्ले देण्यात आले होते त्यातील एक किल्ला म्हणजे कोंढाणा. शिवरायांच्या स्वराज्यातील प्रत्येकानं कोंढाना किल्ल्यावर पुन्हा भगवा फडकविण्याचे स्वप्न पहिले होते. आणि हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शिवरायांचा बालपणीचा मित्र आणि पराक्रमी सरदार तानाजी मालुसरे यांच्यासह मावळ्यांनी एकत्र येऊन हे स्वप्न पूर्ण केले आणि कोंढाणा जिकला. ‘आधी लगीन कोंढाण्याचं मग आमच्या रायबाचं’, असं म्हणणाऱ्या एकनिष्ठ तानाजींना या लढाईत वीरमरण आले. तानाजींचे शौर्य, पराक्रम, जिद्द आणि नेतृत्व हा प्रत्येक पैलू या ट्रेलरमध्ये उलगडला जातो. तसेच तानाजी मालुसरेंचे बलिदान आणि आपल्या राजाप्रती असणारी निष्ठा ट्रेलरच्या माध्यमातून चाहत्यांच्या पसंतीस येत आहे.

‘तानाजी : द अनसंग वॉरियर’ चित्रपटातील इतर कलकारांचे लुक मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर वायरल देखील होत होते, त्यांना चांगली पसंती देखील मिळाली. विशेष म्हणजे या चित्रपटात काजोल देखील दिसणार असून ती तानाजी मालुसरेंची पत्नी सावित्रीबाई मालुसरे यांच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘मी तुम्हाला हरू देणार नाही’ असं कॅप्शन लिहून काजोलनं ‘तानाजी : द अनसंग वॉरियर’ चित्रपटातील तिचा फोटो सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे. तिच्या या मराठमोळ्या लुकचं तुफान कौतुक देखील झालं. कपाळी ठसठशीत कुंकू, नाकात नथ, डोक्यावर पदर आणि करारी नजर अशा लूकमध्ये काजोल ने खूप वाहवा देखील मिळवली. याशिवाय छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत मराठमोळा अभिनेता शरद केळकर दिसणार आहे, तसेच कोंढाण्याचा अधिकारी उदेभान राठोड या अधिकाऱ्याच्या भूमिकेत सैफ अली खान दिसणार आहे. तर अशी भली मोठी स्टार कास्ट चित्रपटात झळकणार आहे.

तानाजी मालुसरेंना कोंढाणा सर करण्याची बातमी कळताच त्यांनी महाराजांकडे जाऊन मुलाचं लग्न बाजूला सारून ‘आधी लगीन कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं’ अशी गर्जना करत आपली एकनिष्ठता स्पष्ट केली. स्वराज्यावर असणारे प्रेम त्यातून झळकत होते आणि मोहीम फत्ते करण्यासाठी त्यांची तलवार तळपत होती. त्यांच्या पराक्रमामुळे मावळ्यांनी किल्ला जिंकला पण सारे प्राण पणाला लावून हा सिंह लढताना धारातीर्थी पडला. ‘गड आला पण सिंह गेला’ असे उद्गार शिवरायांनी काढले आणि त्यांच्याच स्मृतिप्रित्यर्थ कोंढाणा किल्ल्याचं नाव सिंहगड असं ठेवण्यात आलं. लढवय्या तानाजींची ही वीरगाथा ७० एमएम पडद्यावर पाहण्याचा विलक्षण अनुभव नक्कीच सगळ्यांनी उपभोगावा.

Visit : Policenama.com