‘त्या’ जहाज दुर्घटनेत कोल्हापूरमधील तरुण खलाशी बेपत्ता

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन – भारतासह तुर्की, लीबिया आणि इतर देशांचे कामगार असलेल्या दोन जहाजांना भीषण आग लागून १४ खलाशांचा होरपळून मृत्यू झाला होता. तर ९ खलाशी बेपत्ता झाले आहेत. ही घटना सोमवारी (दि.२१) रशियाजवळील समुद्रामध्ये घडली होती. या दुर्घटनेत कोल्हापूर जिल्ह्यातील कडोली गावाचा अक्षय बबन जाधव हा बेपत्ता झाला आहे. भारतीय, तुर्कस्तान आणि लिबियन खलाश्यांना घेऊन जाणारी जहाजे समुद्रामध्ये इंधन भरताना ही आग लागली.

रशियाजवळील कर्चच्या समुद्रात दोन तेलवाहू जहाजांना लागलेल्‍या भीषण आगीत १४ खलाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर ९ जण बेपत्ता आहेत. यातील एका जहाजावर १७ खलाशी होते, त्‍यातील ९ तुर्कस्तानचे आणि ८ खलाशी भारतीय होते. दुसऱ्या जहाजावर १५ खलाशी होते. यामध्ये तुर्कस्तानचे ७ आणि भारताचे ७ खलाशी होते. बेपत्ता असणाऱ्या व्यक्ती मध्ये कोल्हापूरच्या कोडोली गावाचा अक्षय बबन जाधवचा समावेश आहे. रशियन पाणबुडे त्यांचा शोध घेत आहेत.

आग लागलेल्‍या दोन्ही जहाजांवर १५ भारतीय खलाशी असल्‍याची माहिती समोर आली आहे. आग लागलेली दोन्ही जहाजे टांझानिया देशाच्या मालकीची आहेत. यातील एका जहाजात‘लिक्वीफाइड नॅचरल गॅस’ (एलएनजी) होता तर दुसऱ्यामध्ये टँकर्स होते. यातील एका जहाजातून मालवाहू टाकीमध्ये गॅस भरत असताना उचानक मोठा स्फोट झाला. काही क्षणात दोन्ही जहाजांना भीषण आग लागली. यावेळी ३५ खलाशांनी समुद्रात उडी घेतली. यापैकी १२ जणांना वाचविण्यात आले आहे. तर ९ जण अद्याप बेपत्ता आहेत.