नवी दिल्ली, वृत्तसंस्था : कोरोना व्हायरसचे थैमान अद्याप सुरूच आहे. या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर करण्यात आहे आहे, मात्र सर्व काही बंद असल्या कारणाने देशाची अर्थव्यवस्था थांबली आहे. कोरोनामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसणार असून विकास दर २.८ टक्क्यांवर येण्याची शक्यता जागतिक बँकेने व्यक्त केली आहे. लॉकडाउनचा फटका अनेक उद्योगांनाही बसणार आहे. ज्यामुळे कर्मचारी आणि पगार कपात करण्याचे संकेत मिळत आहेत. दरम्यान, अशी बिकट परिस्थिती केवळ भारताचीच नव्हे तर जगभरातील अनेक देशांची आहे. या दरम्यान, एका भारतीय कंपनीने पुढाकार घेऊन कर्मचाऱ्यांना दिलासा देत पुढील एक वर्ष कर्मचारी कपात किंवा पगार कपात करणार नसल्याचे जाहीर केले आहे. टाटा समूहाच्या मालिकीची असलेली टाटा स्टील या कंपनीने ही घोषणा केली आहे.
कंपनीचे ग्लोबल सीईओ टीव्ही नरेंद्रन यांनी स्पष्टपणे सांगितले कि, पुढील एक वर्ष कर्मचारी आणि पगार कपात करणार नाही. कंपनीचे लक्ष्य फक्त सध्याचे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची उत्पादकता वाढविणे आणि त्यांचा विकास करणे आहे. परिस्थिती जशी सुधारेल तशी एक दिर्घकलीन योजना तयार केली जाणार असल्याचेही नरेंद्रन यांनी यावेळी सांगितले. तसेच लॉक डाऊननंतर बाजारपेठेच्या स्थितीबद्दल बोलताना नरेंद्रन म्हणाले, ‘परिस्थिती अद्याप सामान्य नाही. लॉकडाऊन लवकरच हटविले जाईल अशी आशा आहे. परंतु लॉकडाऊन हटविल्यानंतरही सर्व काही नॉर्मल होण्यासाठी जवळपास सहा महिने किंवा एक वर्ष लागले. त्यामुळे आपण कोरोनाविरुद्ध कसे लढणार आहोत हे निश्चित करावे लागेल.
दरम्यान, स्टील उत्पादनाचा समावेश अत्यावश्यक सेवेमध्ये करण्यात आला असला तरी स्टील उत्पादनात कपात केली आहे. टाटा स्टीलच्या कलिगानगर, जमशेदपूर आणि अंगुल येथील प्रकल्प सुरू ठेवण्यास परवागी मिळाली असली तरी लॉकडाऊनचा कालावधी हा एक आव्हानात्मक आहे. फक्त स्टीलची निर्मिती होऊ शकत नाही. त्याच्या जोडीला अन्य गोष्टींची गरज असते. गेल्या दोन ते तीन आठवड्यांपासून कंपनीच्या नफ्यात घट होत आहे. पण यासाठी दिर्घकालीन योजना आहे. त्यावर काम सुरू आहे. टाटा स्टीलच्या प्रकल्पातील ५० टक्के उत्पादन सुरू आहे. कारण सर्व कर्मचाऱ्यांना कामावर बोलवणे धोक्याचे असल्याचेही नरेंद्रन यांनी यावेळी सांगितले.
दुसरीकडे युरोपात लॉकडाऊन नसल्याने टाटा स्टीलचे प्रकल्प सुरू आहेत. पण तेथे ऑटो सेक्टरमध्ये मंदी आहे. दरम्यान, इस्टर नंतर परिस्थिती सामान्य होण्याची शक्यता असल्याचे नरेंद्रन यांनी सांगितले.