मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – इयत्ता दहावी आणि बारावीचे पेपर तपासणाऱ्या शिक्षकांना निवडणुक आयोगाने दिलासा दिला आहे. या शिक्षकांना निवडणुकीचे काम देण्यात येऊ नये, असा आदेश काढण्यात आला आहे.
सध्या बारावी व दहावीच्या परिक्षा सुरु आहेत. परिक्षेबरोबर या लाखो विद्यार्थ्यांचे पेपर तपासून त्यांचा निकाल वेळेवर लावण्याचे मोठे आव्हान एस एस सी बोर्डापुढे असते. जर हे पेपर तपासणाऱ्या शिक्षकांना लोकसभा निवडणुकीचे काम लावल्यास पेपर तपासण्यास उशीर होऊन निकालाला उशीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दहावी, बारावीचे पेपर तपासणाऱ्या शिक्षकांना निवडणुकीचे काम लावू नये, अशी विनंती शिक्षक संघटनांनी निवडणुक आयोगाला केली होती. निवडणुक आयोगाने ही विनंती मान्य केली आहे.
निवडणुक आयोगाचे अधिकारी वळवी यांनी दहावी, बारावीचे पेपर तपासणाऱ्या शिक्षकांना निवडणुकीचे काम देऊ नये, असा आदेश काढला आहे.