सामन्यापूर्वीच भारतीय संघावर पत्रकार नाराज ; ‘या’ कारणामुळे पत्रकार परिषदेवर टाकला बहिष्कार

इंग्लंड : वृत्तसंस्था – क्रिकेटच्या विश्वचषकाच्या महासंग्रामाला सुरुवात झाली आहे. त्यात भारत सोडून सर्व संघांनी एकतरी सामना खेळला आहे. त्यात भारताचा पहिला सामना बुधवारी होणार आहे. परंतू सामन्यापूर्वीच भारतीय संघांनी पत्रकारांची नाराजी ओढावून घेतली आहे. सोमवारी आयसीसीच्या पत्रकार परिषदेत आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेत भारतीय संघाने अश्या दोन खेळाडूंना पाठवले जे वर्ल्ड कप संघाचा भाग नाही आहेत. त्यामुळं नाराज पत्रकारांनी या पत्रकार परिषदेवर बहिष्कार टाकला.

आयसीसी वर्ल्ड कपच्या प्रोटोकॉलनुसार आयसीसी टीम संपुर्ण कार्यक्रमाची माहिती पत्रकारांना दिली जाते. यावेळी संघाच्या सरावाची आणि खेळाडूंबद्दलची माहिती पत्रकारांना दिली जाते. भारतीय संघ २४ मे ला इंग्लंड मध्ये दाखल झाला आहे. त्यानंतर फक्त एकदाच भारतीय संघाची पत्रकार परिषद घेण्यात आली. बांगलादेश विरुद्धच्या सराव सामन्यानंतर के एल राहुलनं पत्रकारांशी संवाद साधला होता. मात्र त्यानंतर कोणत्याही खेळाडूनं किंवा स्टाफने पत्रकारांशी संवाद साधला नाही.

भारतीय संघ आफ्रिकेविरोधात होणाऱ्या सामन्यासंदर्भात पत्रकारांशी संवाद साधणार होता. मात्र पत्रकार परिषदेला सुरुवात होण्याआधी दीपक चहर आणि आवेश खान यांना पत्रकारांशी चर्चेस पाठवण्यात आले. हे दोन्ही गोलंदाज संघाला नेट प्रक्टिससाठी मदत करतात. ते संघाचा भाग नाहीत, त्यामुळे पत्रकारांनी खेळाडूंशी संवाद न साधताच पत्रकार परिषदेवर बहिष्कार टाकला. त्यावर बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी, भारतीय संघानं एकही सामना खेळलेला नाही. त्यामुळं ते काय बोलणार, असे उत्तर देत सारवासारव केली आहे.

दरम्यान, या प्रकाराबाबत आय़सीसीने बीसीसीआयवर नाराजी व्यक्त केली आहे. बीसीसीआयने प्रोटोकॉल न पाळल्याचे पत्र पाठवले होते. भारतीय संघ सामना होऊनही मीडियासमोर आलेले नाही. इतर संघ विविध कार्यक्रमांना हजर असतात. मात्र भारतीय संघ हे टाळतो आहे. त्यामुळे आयसीसी चिंतेत आहे की, भारतीय संघाच्या या वागणुकीमुळं इतर संघही मीडियापासून लांब राहतील. त्यामुळे आयसीसीनं बीसीसीआयला पत्राद्वारे याबाबत खडेबोल सुनावले आहेत.