भारताला विजयासाठी 70 धावांची आवश्यकता

मेलबर्न : पहिल्या डावात १३१ धावांची आघाडी घेतल्यानंतर भारताने आज ऑस्ट्रेलियाचे शेपूटाला जास्त वळवळू दिले नाही. ऑस्ट्रेलियाचे दुसरा डाव २०० धावात गारद झाला असून ही कसोटी जिंकण्यासाठी भारताला आता ७० धावांची आवश्यकता आहे.
पहिल्या डावात भारताने ऑस्ट्रेलियाला १९५ धावात आऊट केले होते. दुसर्‍या डावातही ऑस्ट्रेलियाची धावसंख्या रोखून धरण्यास भारतीय गोलदांज यशस्वी ठरले.

कालच्या ६ बाद १३३ धावसंख्येवरुन ऑस्ट्रेलियाने आज पुढे खेळण्यास सुरुवात केली. बुमराह याने कमिन्सला २२ धावांवर आऊट केले. तेव्हा ऑस्ट्रेलियाची धावसंख्या ७ बाद १५६ होती. त्यानंतर काही धावांच्या अंतराने ऑस्ट्रेलियाच्या विकेट पडत गेल्या. २०० धावसंख्येवर ऑस्ट्रेलियाचा डाव आटोपला.

पहिलीच कसोटी खेळणार्‍या सिराज याने ३ विकेट घेऊन आपले कसोटी पर्दापण जोरात साजरे केले. अश्विन, बुमराह आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी २ विकेट घेतल्या. तर उमेशला एक विकेट मिळाली.

भारताला दुसर्‍या डावात विजयासाठी ७० धावा करायच्या असून भारतीय फलंदाजांनी संयम राखून फलंदाजी केली तर विजय सुकर होणार आहे.