टीम इंडियाचा किवींवर मालिका विजय

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने न्यूझीलंड सात विकेट्स राखून दणदणीत विजय मिळवला. न्यूझीलंडने भारताला २४४ धावांचे आव्हान दिले होते. भारताने हे आव्हान ३ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियाने ३-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. न्यूझीलंडचे तीन बळी घेणारा गोलंदाज मोहम्मद शमी सामन्याचा मानकरी ठरला.

न्यूझीलंडने दिलेले २४४ धावांचे आव्हान स्वीकारून शिखर धवन आणि रोहित शर्मा यांची जोडी मैदानात उतरली. ही जोडी भारतीय डावाची चांगली सुरुवात करून देणार असे वाटत असताना शिखर धवन २८ धावांवर बाद झाला. त्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी दुसऱ्या विकेट्साठी ११३ धावांची भागिदारी रचली. डावाच्या २९ व्या षटकात रोहित शर्मा ६२ धावांवर बाद झाला. त्यानंतर काही धावांची भर घालून विराट ६० धावांवर तंबूत माघारी परतला. सामन्यात न्यूझीलंडचा संघ कमबॅक करत असल्याचे चित्र निर्माण झाले. मात्र, अंबाती रायुडू आणि दिनेश कार्तिक यांनी डावाची अधिक पडझड न होऊ देता भारतीय संघाला विजय मिळवून दिला. या दोघांनी चौथ्या विकेट्ससाठी ७७ धावांची अभेद्य भागिदारी रचली. अंबाती रायुडूने नाबाद ४० आणि दिनेश कार्तिकने नाबाद ३८ धावा पटकावत विजयात मोलाचा वाटा उचलला.

दरम्यान, भारतीय गोलंदाजांनी प्रभावी कामगिरी करताना न्यूझीलंडचा डाव ४९ षटकांत २४३ धावांवर रोखला. न्यूझीलंडने आपले पहिले तीन विकेट्स ५९ धावांमध्ये गमावले होते. त्यानंतर रॉस टेलर आणि लॅथम यांनी चौथ्या विकेट्ससाठी ११९ धावांची भागिदारी रचली. अखेर यजुवेंद्र चहलने लॅथम अडथळा दूर करत भागिदारी फोडली. त्यानंतर टेलर एका बाजूने फलंदाजीचा किल्ला लढवत असताना भारतीय गोलंदाजांनी इतर किवी फलंदाजांना फार वेळ खेळपट्टीवर स्थिरावून दिले नाही. मोहम्मद शमीने टेलरला झेलबाद केले. टेलरने १०६ चेंडूत ९३ धावांची खेळी साकारली. त्यानंतर किवींचा डाव २४३ धावांवर आटोपला. भारताकडून मोहम्मद शमीने ४१ धावांत तीन बळी घेतले. तर, भुवनेश्वर, चहल आणि हार्दिक पांड्या यांनी प्रत्येकी दोन बळी टिपले.