तहसिलदार सुभाष यादव यांचं 31 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्यानं निधन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – एटापल्लीचे तहसिलदार सुभाष यादव(31) यांचं आज सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालं. आज सकाळी साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली. त्यांचा प्रेमळ आणि मनमिळावू स्वभाव तसेच प्रशानसनामुळे ते अल्पावधीत लोकप्रिय झाले होते. त्यांच्या अचानक जाण्यानं परिसरातून हळहळ व्यक्त होताना दिसत आहे. यादव आलापल्ली येथे पत्नी व लहान मुलासोबत रहात होते.

सुभाष यादव यांना आज सकाळी 8 वाजता घरी असतानाच हृदयविकाराचा झटका आला. त्यांना लगेचच अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं. यावेळी उपचार सुर असताना त्यांना दुसरा झटका आला. यानंतर काही वेळातच त्यांनी प्राण सोडला. यादव हे मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत येथील रहिवासी होते.

यादव यांच्याबद्दल अधिक माहिती अशी की, ते 2014 च्या तुकडीतले अधिकारी आहेत. वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे नायब तहसिलदार म्हणून त्यांची पहिली पदस्थापना झाली. त्यानंतर 13 सप्टेंबर 2019 रोजी ते एटापल्ली येथे तहसिलदार म्हणून रुजू झाले होते.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/