Video : या कारणामुळं गावकर्‍यांनी आमदारावर केला चप्पलांचा ‘वर्षाव’

नवी दिल्ली : वृत्त संस्था – गेल्या काही दिवसांपासून तेलंगणामध्ये पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. यामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. यामुळं मोठं नुकसानही झालं आहे. जोरदार पावसामुळं अनेक ठिकाणी पूरजन्य स्थिती निर्माण झाली होती. सरकारी आकडेवारीनुसार, तेलंगणात झालेल्या विविध दुर्घटनांमध्ये 50 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तसंच कोट्यावधीचं नुकसन झाल्याची माहिती समोर आली आहे. अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे.

पावसामुळं नागिरकांना घराबाहेर न पडण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. या जोरदार पावसामुळं अनेकांची घरं कोसळली आहेत. सर्वांनाच याचा फटका बसला आहे. अशात पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी गेलेल्या आमदाराला स्थानिकांच्या रोषाचा सामना करावा लागला आहे. संतापलेल्या नागरिकांनी या आमदाराला चपला फेकून मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत असून यात अनेक लोक चपला फेकून मारताना दिसत आहेत.

समोर आलेल्या माहितीनुसार, इब्राहिमपट्टनमचे आमदार मचीरेड्डी किशन रेड्डी आणि टीआरएसचे कार्यकर्ते पुराचा फटका बसलेल्या मेडिपल्ली येथे पाहणी करण्यासाठी गेले होते. मात्र तेथील स्थानिकांनी पुरामुळं झालेल्या नुकसानीमुळं संतापाच्या भरात आमदार आणि त्यांच्या समर्थकांना चपला फेकून मारल्या. गुरुवारी ही घटना घडली. तसंच आमदाराच्या गाडीचीही तोडफोड करण्यात आली होती.

मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या आढावा बैठकीत अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या पावसामुळं घडलेल्या वेगवेगळ्या दुर्घटनांमध्ये 50 जणांचा मृत्यू झाला आहे. ग्रेटर हैदराबाद नगर निगम (जीएचएमसी) क्षेत्रात मृतांचा आकडा 11 पर्यंत गेला आहे. या पावसामुळं 5 हजार कोटींचं नुकसान झालं आहे असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. एका हिंदी वेबसाईटनंही याबाबत वृत्त दिलं आहे.