एका दिवसात तब्बल 4 अंशांची तापमानवाढ

मुंबई: मार्चचा पहिला आठवडा उकाड्याचा ठरल्यानंतर काही दिवस तापमानात घट झाली होती. मात्र शनिवारी मुंबईकरांना पुन्हा उन्हाचे तीव्र चटके सोसावे लागले. मार्च महिन्यातील सर्वाधिक तापमान नोंदवले गेले. कुलाबा केंद्रावर ३४.८ अंश, तर सांताक्रूझ केंद्रावर ३८.२ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. यापूर्वी ४ मार्चला ३८.१ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदवले गेले होते. शनिवारी नोंदवलेल्या तापमानात शुक्रवारच्या तुलनेने जवळपास पाच अंशांनी वाढ झाली आहे.

मार्चचा पहिला आठवड्यानंतर तापमानात घट होत ३५ अंशांखाली गेली होती. सर्वाधिक घट ११ मार्चला, ३१.७ अंश सेल्सिअस नोंदवली गेली. मात्र शनिवारी अचानक तापमानाने उसळी घेतली. दरम्यान वातावरणातील बदलामुळे तापमानात वाढ झाली आहे. जमिनीलगत वाहणाऱ्या उत्तरपूर्वी वाऱ्यांमुळे समुद्रावरून येणारी हवा उष्ण स्वरूपाची होती. त्याचा परिणामी शनिवारी कमाल तापमानाच्या वाढीमध्ये झाली. पुढील दोन दिवस अशीच स्थिती राहणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले.