दहावी, बारावीची परीक्षा एप्रिल-मे मध्ये, शिक्षणमंत्र्यांची माहिती

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – कोरोनामुळे आठ महिने बंद असलेली शाळेची घंटा दिवाळींनंतर वाजली परंतु ९ ते १२ पर्यंतचे वर्ग सुरुझाले. अजूनही कोरोनाचे संकट काही दूर झाले नाही. पण योग्य ती खबरदारी वर्ग सुरु आहेत. यंदा बारावी व दहावीच्या परीक्षा नेहमीच्या पद्धतीनेच, परंतु काहीशा उशिरा म्हणजे एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात घेण्यासंदर्भात विचारविनिमय सुरू असल्याचे शालेय शिक्षणमंत्रीवर्षा गायकवाड यांनी सांगितले.

गायकवाड म्हणाल्या की, राज्यात २३ नोव्हेंबरपसून ९वी ते १२वीचे वर्ग सुरू झाले असून, ५ लाखांहून अधिक विद्यार्थी उपस्थिती राहत आहेत. नववी, अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी चालू शैक्षणिक वर्षाचे महत्त्व लक्षात घेऊन प्राधान्याने त्यांचा अभ्यास व परीक्षा पद्धतीचा विचार शिक्षण विभाग करत आहे, ज्यामुळे पुढील वर्षी बोर्डाच्या परीक्षेत त्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही. या संदर्भात शिक्षक, मुख्याध्यापक, शिक्षण तज्ज्ञांशी विचारविनिमय सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पहिली ते आठवीचे वर्ग तूर्त नाही
काही जिल्ह्यांतील नववी ते बारावीचे वर्ग सुरळीत सुरू झाले असून या वर्गांमधील विद्यार्थी संख्यादेखील वाढत आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावाने विद्यार्थी व शिक्षक संक्रमित झाले नाहीत, ही अत्यंत समाधानकारक बाब आहे. मात्र, लहान मुलांना शाळेत सामाजिक अंतर व आरोग्यविषयक सूचनांचे पालन करणे तितकेसे सहज शक्य नसल्याने सध्या पहिली ते आठवीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यासाठी आम्ही अद्याप कोणतीही भूमिका मांडली नसल्याचे शिक्षणमंत्री गायकवाड यांनी सांगितले.

सुरक्षा, आराेग्याला प्राधान्य
नववी ते बारावीचे वर्ग सुरु करताना सुरक्षा, आराेग्याला प्राधान्य दिले होते. त्याप्रमाणेच
पहिली ते आठवीचे वर्ग सुरू करताना, सर्वप्रथम या वर्गातील विद्यार्थी, शिक्षक संख्या, शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांच्या आराेग्याची काळजी घेणे, त्यांची सुरक्षा, कोरोना चाचण्या व वर्गातील नियोजन ही मोठी जबाबदारी आहे. भविष्यकालीन उपाययोजना, सुरक्षा, आरोग्यविषयक बाबींचा विचार करून, तसेच या संदर्भात स्थानिक प्रशासन व आरोग्य विभागाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच सरकार योग्य तो निर्णय घेईल, असे वर्षा गायकवाड यांनी शेवटी स्पष्ट केले.