30 शहरात हाय अलर्ट ! ‘जैश’ला कलम 370 चा घ्यायचाय ‘बदला’, ‘या’ व्हीआयपींवर हल्ल्याचा ‘प्लॅन’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताने जम्मू आणि काश्मीरमधील कलम 370 रद्द केल्यानंतर चवताळलेल्या पाकिस्तानने भारताविरुद्ध कारस्थाने रचण्यास सुरुवात केली आहे. या आधी देखील पाकिस्तानने भारताबरोबरचा व्यापार बंद करून भारताला धमकी देण्याचा प्रयत्न केला होता. तसेच दोन्ही देशांमधील रेल्वे देखील रद्द केली आहे. त्यानंतर आता पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना देखील मोदींना मारण्याचा कट रचत असल्याची माहिती समोर आली आहे. या निर्णयाचा बदला म्हणून जैश-ए-मोहम्मद हि संघटना भारतावर हल्ला करण्याची तयारी करत असल्याची माहिती मिळत आहे.

या हल्ल्यामध्ये काही प्रमुख व्यक्तींना लक्ष्य करण्याची देखील या संघटनेची योजना असल्याची माहिती मिळत आहे. भारतातील काही प्रमुख व्यक्तींवर हल्ला करण्याची योजना असल्याची माहिती भारताच्या गुप्तचर विभागाने दिली आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यावर हल्ल्याचा कट राखत असल्याची माहिती सुरक्षा यंत्रणांना मिळाली आहे. यासाठी या दहशतवादी संघटनेला पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणांमधील एक मेजर देखील सहभागी असल्याची माहिती समोर येत आहे. कलम 370 हटवल्याप्रकरणीच हा हल्ला केला जाणार असल्याची माहिती आहे.

30 शहरात हाय अलर्ट –

जैश-ए-मोहम्मदकडून हल्ला होण्याची शक्यता वर्तवल्यानंतर भारतातील विविध शहरांत हाय अलर्ट देण्यात आला आहे. देशातील 30 शहरांचा यामध्ये समावेश असून जयपूर, गांधीनगर, कानपूर, जम्मू, अमृतसर, पठानकोट आणि लखनऊ या शहरांचा यामध्ये समावेश आहे. येथील पोलिसांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याचबरोबर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या देखील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. सर्जिकल स्ट्राईकमध्ये त्यांनी मुख्य भूमिका पार पाडली होती. त्यामुळे ते दहशतवाद्यांच्या निशाण्यावर आहेत.

Visit : policenama.com