वाल्याचा वाल्मीकी झालेल्यांनी माझ्यावर टीका करणे हस्यास्पद ; केसरकारांचा नारायण राणेंना टोला

सावंतवाडी : पोलीसनामा ऑनलाइन – सिंधुदूर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. वाल्याचा वाल्मीकी झालेल्यांनी माझ्यावर टीका करावी हे हस्यास्पद आहे. असा टोला पालकमंत्री दीपक केसरकर यांनी राणेंना लगावला आहे.

सिंधुदुर्ग पोलिसांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कणकवली येथील एका हॉटेलमधून छोटा राजनचा साथीदार निलेश उर्फ पटल्या पराडकर याला ताब्यात घेतले आहे. पराडकर हा कुख्यात गॅंगस्टर आहे. त्याच्यावर खून, खुनाचे प्रयत्न, धमकी, खंडणी, अपहरण, विनयभंग असे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. तो सिंधुदुर्गात शिवसेनेच्या प्रचारात सर्रास फिरत होता. इतकेच नव्हे तर, पराडकर शिवसेनेच्या प्रचारसभांमध्ये विनायक राऊत आणि गृहराज्यमंत्री केसरकर यांच्यासोबत बसत होता. बऱ्याच दिवसांपासून मुंबई पोलिसांना त्याचा शोध होता. याचदरम्यान तो सिंधुदुर्गत असल्याची माहिती स्थानिक पोलिसांना मिळताच. जिल्हा पोलिस अधीक्षकांनी सापळा रचून रात्री ९ वाजता त्याला ताब्यात घेतले.

दरम्यान, नारायण राणे आणि त्यांचे दोन्ही पुत्र नितेश राणे आणि निलेश राणे यांनी पालकमंत्री दीपक केसरकर तसेच आमदार वैभव नाईक यांच्यावर टीकास्त्र सोडले. पोलिसांनी पराडकर याला ताब्यात घेतल्यानंतर वैभव नाईक हे अर्ध्यातासात कणकवली पोलिस ठाण्यात पोहोचले. याचबरोबर पराडकरसोबत केसरकर हे व्यासपीठावर होते. असा आरोप त्यांनी केला.

त्यावेळी राणे यांच्या आरोपावर प्रत्युत्तर देतांना, माझ्या व्यासपीठावर कोण बसले हे मला माहीत नाही. त्याची चौकशी केली जाईल. पण वाल्याचा वाल्मीकी झालेल्यांनी माझ्यावर टीका करावी हे हस्यास्पद आहे. असे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी म्हंटले.