राज्यातील विद्यापीठांना नोव्हेंबरपर्यंत निकाल जाहीर करावा लागणार

पोलिसनामा ऑनलाईन – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठ अनुदान आयोगाने अंतिम वर्षांची परीक्षा घेण्यासाठी राज्यातील विद्यापीठांना 31 ऑक्टोबपर्यंत मुदत दिली आहे. त्यानुसार नोव्हेंबरच्या पहिल्या आठवडयापर्यंत निकाल जाहीर करण्याची सूचनाही दिली आहे. अंतिम वर्षांची परीक्षा घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने 28 ऑगस्ट रोजी दिले. आयोगाच्या 6 जुलैच्या मार्गदर्शक सूचनांनुसार विद्यापीठांना ही परीक्षा प्रक्रिया 30 सप्टेंबपर्यंत पूर्ण करणे बंधनकारक होते.

सर्वोच्च न्यायालयाने ज्या राज्यांना 30 सप्टेंबपर्यंत परीक्षा घेणे शक्य नाही अशा राज्यांनी आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा आधार घेत परीक्षा पुढे ढकलण्याबाबत विद्यापीठ अनुदान आयोगाकडे परवानगी मागावी असेही सांगितले होते. त्यानुसार शासनाने आयोगाकडे मुदतवाढ मागितली होती. आयोगाने ही मुदतवाढ मंजूर केली. आता राज्यातील विद्यापीठांना 31 ऑक्टोबपर्यंत परीक्षा घेण्याची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. परीक्षा सुरू असतानाच मूल्यांकनाचे कामही सुरू करावे, जेणेकरून निकाल नोव्हेंबरच्या पहिल्या आठवडयापर्यंत जाहीर करणे शक्य होईल. निकाल वेळेत जाहीर झाल्यास पुढील प्रवेश प्रक्रियाही तात्काळ सुरू करता येईल,’ असे आयोगाने म्हटले आहे.