‘महाविकास’च्या ठाकरे सरकारचा नवा ‘विक्रम’ ! जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभा निवडणुकीच्या निकालात कोणालाही बहुमत न मिळाल्याने जवळपास एक महिना नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी होऊ शकला नव्हता. त्यामुळे आमदार होऊनही अधिकार मिळत नव्हते. तशीच काहीशी अवस्था आता ठाकरे सरकारमधील ६ मंत्र्यांची झाली आहे. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबरोबर मंत्रीपदाची शपथ तर घेतली. पण त्यांना खातेवाटप करण्यात आले नाही. त्यामुळे गेली १० दिवस ते मंत्री आहेत, पण काम मात्र काही करु शकत नाही. तब्बल १० दिवस खात्याविना मंत्र्यांना ठेवण्याचा नवा विक्रम ठाकरे सरकारने नोंदविला आहे.

उद्धव ठाकरे यांनी २८ नोव्हेंबर रोजी शिवाजी पार्कवर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्याबरोबरच शिवसेनेचे एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात, नितीन राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील, छगन भुजबळ यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.

शपथ घेतल्यानंतर साधारण दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री खातेवाटप करतात. मंत्री करत असतानाच त्यांना कोणते खाते द्यायचे हे जवळपास ठरलेले असते. मात्र, बंडखोरी करुन पुन्हा पक्षात परत आलेल्या अजित पवार यांना उपमुख्यमंत्री करा, अशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची मागणी आहे. तर, दुसरीकडे बंडखोरीचे प्रकरण पूर्ण शांत झाल्यानंतर आपण उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊ असे अजित पवारांचे म्हणणे आहे. त्यामुळे मंत्र्यांचे खाते वाटप रखडले आहे. सुरुवातीला विश्वास दर्शक ठरावानंतर मंत्रीमंडळाचा विस्तार करण्यात येईल व खाते वाटप होईल, असे सांगण्यात आले होते. मात्र, त्यानंतर विश्वास दर्शक ठराव संमत झाला. विधानसभेचे अध्यक्ष, विरोधी पक्षनेता यांची निवड झाली. त्यानंतरही ना मंत्रीमंडळाचा विस्तार झाला ना असलेल्या मंंत्र्यांना खातेवाटप झाले.

अनेकदा मंत्री आपल्याला नको असलेल्या अधिकाऱ्यांची बदली करतात. पण काही अधिकारी असे असतात की त्यांची कोठेही बदली केली तरी ते कठोरपणे काम करायचे सोडत नाही. अशावेळी अशा अधिकाऱ्यांच्या जागेवर दुसऱ्यांची बदली करतात. पण त्या अधिकाऱ्यांला कोणतेही पद न देता वेटिंगवर ठेवतात. उद्धव ठाकरे यांनी असेच या ६ जणांना मंत्री तर केले.

पण कोणतेही खाते न दिल्याने गेल्या १० दिवसांपासून केवळ चर्चा करण्यापलिकडे हे मंत्री काहीही करु शकत नाही की कोणताही निर्णय घेऊ शकत नाही काय मंत्री असले तरी त्यांना अजून खाते मिळाले नसल्याने निर्णय घेण्याचा काहीही अधिकार मिळालेले नाही. मंत्री झाल्यानंतर तब्बल १० दिवस खात्याविना राहिल्याचे देशात आजवर कधीही झाले नाही. मात्र, ठाकरे सरकारने आपल्या ६ मंत्र्यांना कोणतेही खाते न देता हा विक्रम केला आहे.

Visit : Policenama.com