उच्च न्यायालयाने ठाकरे सरकारला ‘या’ कारणावरून फटकारले; म्हणाले – ‘किती जणांवर अटकेची कारवाई करणार ?’

पोलीसनामा ऑनलाइन : उच्च न्यायालयाने राज्यातील ठाकरे सरकारला एका सुनावणीदरम्यान फटकारले. तसेच टीका करणार्‍या अशा किती जणांवर अटकेची कारवाई करणार? असा सवालदेखील उच्च न्यायालयाने ठाकरे सरकारला विचारला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याविषयी सोशल मीडियावरून आक्षेपार्ह विधान करणार्‍या एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यावरून उच्च न्यायालयाने राज्यातील ठाकरे सरकारला फटकारले.

आक्षेपार्ह टीका केल्याप्रकरणी दाखल झालेला गुन्हा रद्द करावा, अशी मागणी करत ‘या’ महिलेने उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली होती. या संदर्भातील याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने किती जणांवर अटकेची कारवाई करणार? असा सवालदेखील ठाकरे सरकारला केला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्याबाबत समाजमाध्यमावरून आक्षेपार्ह वक्तव्य करणार्‍या, तसेच चित्रफीत प्रसिद्ध केल्याप्रकरणी सुनैना होले या महिलेवर गुन्हा दाखल केला होता. दाखल झालेला गुन्हा रद्द करावा, या मागणीसाठी होले यांनी अ‍ॅड. अभिनव चंद्रचूड यांच्यामार्फत याचिका दाखल केली होती.

न्यायमूर्ती एस. एस. शिंदे व न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठासमोर मंगळवारी या याचिकेवर सुनावणी झाली. यावेळी होले यांनी सरकारच्या धोरणांबाबत केवळ तिचे मत व्यक्त केले होते. परंतु राजकीय पक्ष, सरकार आणि सरकारी धोरणांवर समाजमाध्यमांवरून टीका करणार्‍या व्यक्तींना तसे करण्यापासून रोखण्याची आवश्यकता आहे, असा युक्तिवाद सरकारी वकील वाय. पी. याज्ञिक यांनी न्यायालयासमोर केला.

स्वत:च्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा उपभोग घेताना इतरांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे उल्लंघन होणार नाही, याची काळजी घेणे गरजेचे आहे. मात्र, असे असले तरी लोकशाहीमध्ये सरकारी धोरणांवर होणार्‍या टीकांचा सामना सरकारला करावाच लागेल, असे न्यायालयानं म्हटलंय. समाज आणि व्यक्तीचे मूलभूत अधिकार यात समतोल राखणे आवश्यक आहे. लोकशाहीमध्ये तो राखला गेला पाहिजे, असे नमूद करताना सरकार किंवा सरकारी धोरणांवर टीका करणार्‍या प्रत्येकावर तुम्ही अटकेची कारवाई करणार का?, किती जणांवर तुम्ही अशी कारवाई करणार?, अशी विचारणादेखील न्यायालयाने केलीय.

तसेच होले यांच्या वक्तव्यामागील हेतूचा पोलीस तपास करत आहेत, असेही सरकारी वकिलांनी न्यायालयाला सांगितले. त्यावर प्राथमिक तपासणी अहवालाच्या आधारे होले यांच्यावरील गुन्हा रद्द करावा की, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करेपर्यंत थांबावे, अशी विचारणा न्यायालयाने केलीय. तसेच सरकार आणि चंद्रचूड यांनी याबाबत गुरुवारी युक्तिवाद करण्याचे आदेश दिलेत.