उभ्या पिकात बुलडोझर घातल्याने काम बंद पाडले ! दीड तासांच्या चर्चेनंतर काम पूर्ववत सुरू

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – अकोले तालुक्यात सुरू झालेले निळवंडे कालव्यांच्या खोदाईचे काम इंदोरी येथील शेतकऱ्यांनी बंद पाडले होते. उभ्या पिकात बुलडोझर घालून पीक उद्ध्वस्त केल्याच्या कृतीचा निषेध करत आंदोलकांनी सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या. सुमारे दीड अधिकाऱ्यांनी आंदोलकांशी चर्चा केली. त्यानंतर काम पूर्ववत सुरू झाली.

शुक्रवारी धुमाळवाडीपर्यंत कालव्यांचे रेखांकन करण्यात आले होते. शनिवारी याभागात प्राथमिक पातळवरील कालवे खोदाईचे काम सुरू झाले होते. इंदोरी येथे कालवेग्रस्त कृती समितीच्यावतीने आबाजी चिमाजी धुमाळ, खंडू वाकचौरे, शंकरराव वाळुंज, भाऊसाहेब धुमाळ, भाऊसाहेब वाळुंज, संतोष तिकांडे आधी कालवेग्रस्त शेतकऱ्यांनी नेतृत्वाखाली बुलडोझर पुढे बसून काम बंद पाडले. कालवे खोदाईचे काम कोणत्याही परिस्थितीत थांबणार नाही. न्यायालयाचा अवमान होईल, असे अधिकारी समजून सांगत होते. कार्यकर्ते सुरुवातीला जोशात असल्याने त्यांनी अधिकाऱ्यांची विनंती धुडकावली.

पोलिसांनी आंदोलानातून उद्भवणाऱ्या परिस्थितीची जाणीव शेतकऱ्यांना करून दिली. तलाठी सचिन मांढरे यांनी महसूलकडून पिकांच्या नुकसानीचे पंचनामे सुरू असल्याचे सांगितले. आंदोलकांनी आक्रमक पवित्रा सोडला नाही. पोलिसांची कुमक वाढविताच आंदोलकांची तीव्रता कमी होत गेली.