अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – शहराचा कचरा डेपो आज रात्री आगीत भस्मसात झाला. रात्री उशिरापर्यंत आग आटोक्यात आणण्याचे काम सुरू होते. डेपोच आगीत भस्मसात झाल्याने शहरातील कचऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.
याबाबत माहिती अशी की, संपूर्ण शहराचा कचरा सावेडी डेपोत आणून टाकला जात आहे. डेपोच्या आवारात साचलेल्या कचर्याला सोमवारी सायंकाळी आग लागली. आग लागल्यामुळे परिसरात धुराचे लोट पसरण्यास सुरूवात झाली आहे. रात्री उशिरापर्यंत आग सुरू होती.
आगीची माहिती मिळतात महापौर बाबासाहेब वाकळे, प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्यासह घनकचरा व्यवस्थापन विभाग, नगरसेवक आदी उपस्थित होते. गेल्या दोन दिवसांपासून डेपोतील कचरा पेटविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे सांगितले जात आहे.
रविवारीही कचरा पेटविण्याचा प्रयत्न झाला होता. डेपोच्या एका बाजूच्या संरक्षक भींतीचे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही. त्यामुळे मनपाने सुरक्षा रक्षक नेमावेत, अशी मागणी अनेकवेळा ठेकेदाराने केलेली आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. यापूर्वीही डेपोला आग लागली होती. ती आग विझविण्यासाठी तीन-चार दिवस प्रयत्न करावे लागले होते.