‘गाय मालकावर नाराज झाली, तरी ती खाटकाच्या घरी जात नाही, आम्ही मोदींसोबत आहोत’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत भारताचं प्रचंड नुकासान झालं आहे. रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. मृतांचा आकड्यांमध्ये रोज मोठी भर पडतेय आणि दुसरीकडे औषधं, ऑक्सिजन, बेड अशा वैद्यकीय सुविधांचा अभाव लोकांचा जीव जाण्यास कारणीभूत ठरत आहे. सरकारच आरोग्य सेवांचे व्यवस्थापन पूर्णपणे अपयशी ठरल्यानंतर एकीकडे त्यांच्यावर सोशल मीडीयाच्या माध्यमातून जोरदार टीका होत आहे. तर अभिनेते आणि कट्टर मोदी समर्थक अनुपम खेर यांनी कोरोना साथीचा मुकाबला करण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार कमी पडले आहे, अशी टीका केली. स्वत:ची प्रतिमा निर्माण करण्यापेक्षा आयुष्यात आणखीही महत्त्वाची कामे असतात, असा टोला खेर यांनी मोदी सरकारला लगावला.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे लोकांकडून सरकारविरोधी आपला राग सोशल मीडियाच्याम मध्यमातून व्यक्त केला जात आहे. सध्या निर्माण झालेल्या परिस्थितीमधील अनेक दोषांसाठी सरकारची धोरणं जबाबदार असल्याचे सांगत सोशल मीडियावर सरकारवर निशाणा साधला जात आहे. याच दरम्यान केंद्र सरकारवर होत असलेल्या आरोप प्रत्यारोपांमध्ये अभिनेते आणि फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटचे (FTII) माजी अध्यक्ष गजेंद्र चौहान यांनीही उडी घेतली आहे.

अभिनेता गजेंद्र चौहान यांनी आपल्या एका ट्विटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचं समर्थन करत त्यांना आपला पाठिंबा दिला आहे. गजेंद्र चौहान यांनी आपल्या ट्विटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख करताना लिहिलं, गाय आपल्या मालकावर नाराज असली तरी ती रुसून कसायाच्या घरी जात नाही. त्यामुळेच आम्ही मोदींसोबतच आहोत. आपल्या ट्विटमधून गजेंद्र चौहान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारला जाहीर पाठिंबा दिला आहे. गजेंद्र चौहान यांचे हे ट्विट दोन हजार 700 पेक्षा अधिक वेळा रिट्विट झालं आहे. तर 13 हजार जणांनी लाईक केले आहे.

तर खाटीक कोण आहे…

जतीन नावाच्या एका युझरने चौहान यांच्या या पोस्टवर कमेंट केली आहे. तुम्ही मोदींसोबत आहात हा तुमचा भ्रम आहे. खरं तर मोदींना त्यांच्या पदावर प्रेम आहे आणि तुम्हाला भविष्याची चिंता आहे. तुम्ही जनतेला गाय म्हणत आहात तर खाटीक कोण, हे आपण स्पष्ट करावं. लोकं इथे तडफडत मरत आहेत हे तुम्हाला फार महत्त्वाचं वाटत नाही का ? हे तुमच्या भविष्यासाठी ग्रहण ठरणार लक्षात ठेवा, असा इशारा चौहान यांना दिला आहे.