Coronavirus : पुण्यातील ‘कोरोना’चा मृत्यूदर कमी होण्यासाठी सरकारचा नवा ‘प्लॅन’, जाणून घ्या

पोलिसनामा ऑनलाईन – राज्यातील सर्वाधिक कोरोनाचा कहर पुणे शहरात झाला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण वाढत चालले आहे. विशेषतः ससून रूग्णालयात दाखल होणार्‍या कोरोना बाधितांच्या मृत्यूची आकडेवारी जास्त असल्यामुळे आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. त्यापार्श्वभूमीवर  कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्य सरकारकडून नव्याने प्लॅन आखण्यात आला असून त्रिसूत्री कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

पुण्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा वाढलेला मृत्यूदर प्रशासनासाठी डोकेदुखी ठरत होता. त्यानंतर गेल्या काही दिवसांपासून  मृत्यूदर कमी करण्यात प्रशासनाला थोडे यश आले होते. मात्र ससून रुग्णालयात होणार्‍या मृत्यूनंतर सरकारने  नव्याने प्लॅन आखला आहे.
आजाराचे लवकरात लवकर निदान, स्पष्ट लक्षणे नसणारे रुग्णांची काळजी आणि अतिदक्षता विभागातील रुग्णसेवेचा दर्जा उंचावणे या त्रिसूत्रीच्या आधारे कोरोनाबाधितांचा मृत्यूदर कमी करण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत. ’ससून रुग्णालयातील अतितक्षता विभागात रुग्णसेवेचा दर्जा आता आणखी उंचावण्यात आला आहे.  अत्यवस्थ रुग्ण दाखल झाल्यानंतर त्याच्यावर लवकरात लवकर उपचार करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. याआधारे आगामी काळात आपण हा मृत्यूदर कमी करू शकतो,’ असा विश्वास कोरोनाविरोधातील लढाईतील सरकारचे प्रमुख तांत्रिक सल्लागार डॉ. सुभाष साळुंखे यांनी व्यक्त केला आहे.

कोरोनाचा भारतात शिरकाव झाल्यानंतर पुण्यात सर्वाधिक रुग्ण आढळले होते. नंतरच्या काळात ही रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यात प्रशासनाला यश आले होते. मात्र गेल्या चार दिवसांपासून शहरात पुन्हा एकदा कोरोनाबाधितांचा संख्या वाढू लागली आहे. ससूनमध्ये कोरोनाग्रस्तांचा जास्त असलेला मृत्यूदर चिंताजनक आहे. ससूनमध्ये जास्तीत जास्त अत्यवस्थ रुग्णच दाखल होतात, त्यामुळे हा मृत्यूदर जास्त आहे.  पुण्यातील कोरोनाबाधितांच्या मृत्यूचे प्रमाण कमी करून रूग्ण बरे करण्यात वाढ होत असल्याची महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी माहिती दिली आहे. पुढच्या दहा दिवसांत आंतरराष्ट्रीय मृत्यू दरापर्यंत पुण्यातली आकडेवारी खाली येण्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.