पुरंदर विधानसभेच्या जागेचा निर्णय अजूनही अनिश्चितच !

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन – (संदीप झगडे) पुरंदर विधानसभेच्या जागेबाबत दोन्ही काँग्रेसचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील. मात्र निर्णय होईल तो पुरंदर आणि संघटनेच्या हिताचा असेल, कार्यकर्त्यांशी चर्चा केल्याशिवाय परस्पर निर्णय होणार नाही असे खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केल्याने काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांच्या येथून आघाडीतर्फे असलेल्या उमेदवारीवरही टांगती तलवार निर्माण आली आहे. सासवड येथे शनिवारी खासदार सुळे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. यात कार्यकर्त्यांनी येथील विधानसभेच्या जागेसाठी आग्रह धरला.

यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, जालिंदर कामठे, माजी आमदार अशोक टेकवडे, जगन्नाथ शेवाळे, पुरंदरचे निरीक्षक हरी सणस, विजय कोलते, सुदाम इंगळे, माजी सनदी अधिकारी संभाजी झेंडे, डॉ. दिगंबर दुर्गाडे, शिल्पा भोसले, गौरी कुंजीर, आदी उपस्थित होते.

लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांना केलेल्या प्रामाणिक मदतीच्या जोरावर आणि त्या वेळी दिलेल्या आश्वासनानुसार हा मतदारसंघ आघाडीमध्ये काँग्रेसला सोडून आपल्याला उमेदवारी निश्चित आहे, या बळावर विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागलेल्या काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांना सुळे यांच्या या विधानामुळे चांगलाच धक्का बसला आहे.

हा मतदारसंघ शरद पवारांना मानणारा आहे. त्यामुळे पुरंदर विधानसभेची जागा राष्ट्रवादीला मिळावी अशी मागणी असून तसे ठरावे केले असल्याचे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष माणिकराव शेंडे यांनी सांगितले. तर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे यांनाही तेथील जागा राष्ट्रवादीने लढवण्याची मागणी करीत, येथून जर राष्ट्रवादीचा उमेदवार असेल तर काम करणार; अन्यथा घरी बसणार असे सांगत भावना व्यक्त केल्या.
पक्षाचे निरीक्षक सणस यांनी तालुक्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची भावना राष्ट्रवादीच्या उमेदवाराने लढवण्याचे आहे मात्र दोन्ही काँग्रेसच्या लढते मुळे आघाडीच्या मतांची विभागणी होते, यात मुंबईच्या पाहुण्यांचे होते आता पुन्हा उमेदवार निवडून यायला नको त्यामुळे आघाडीतून लढण्याची गरज असल्याचे सांगितले तर राष्ट्रवादीचे इच्छुक संभाजी झेंडे यांनी, तिकिटाच्या मुद्द्यावर भाष्य न करता, सासवडच्या गुंजवणी आलेल्या दोन पाईप बद्दल बोलताना येथील मंत्री विमानतळ करण्यास हुशार आहेत मात्र विमानतळ ही बाब राज्य शासनाचे नाही हे त्यांना माहित नाही, आता गुंजवणी पाणी विमानाने सासवडच्या पालखीतळावर येणार असा उपहासात्मक टोला लगावला.