पोलिस कन्येच्या मृत्यूप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांना घेराव अहमदनगर: महावितरण कंपनीच्या कर्मचा-यांच्या गलथानपणामुळेच पोलीस मुख्यालयात विजेच्या धक्क्याने तरुणीचा मृत्यू झालेला आहे त्यामुळे महावितरण कंपनीच्या दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. तसेच मयत तरुणीच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांकडे केली आहे.
शिवसेना उपनेते अनिल राठोड, शहरप्रमुख दिलीप सातपुते, बाळासाहेब बोराटे, दत्ता जाधव, गिरीश जाधव, संभाजी कदम, संजय शेंडगे, संतोष गेनाप्पा, महेंद्र बिज्जा, सचिन शिंदे, सुरेश तिवारी,अमोल येवले, सुहास पाथरकर आदींच्या शिष्टमंडळाने महावितरणचे अधीक्षक अभियंता यांची भेट घेऊन निवेदन दिले.
शहरात अनेक भागात वीजपुरवठा तीन दिवस बंद होता. त्यामुळे नागरिक, विद्यार्थी, वृद्धांचे अतोनात हाल होत आहेत. वीज बंद झाल्यावर वीज केव्हा येईल याची उत्तरे जनतेला मिळत नाहीत. मोबाईल किंवा फोन उचलत नाहीत व बंद करून निघून जातात. महावितरणची आपतकालीन व्यवस्था सुरु केली का नाही याची माहिती व फोन नंबर जनतेला मिळावे आणि आपतकालीन व्यवस्था १५ मिनिटात हजर रहावी. गुरुवारी पोलीस मुख्यालयात विजेच्या धक्क्याने तरुणीच्या मृत्यूची दुदैर्वी घटना घडली होती. अनेक वेळेस तक्रार करूनसुध्दा ती दुरुस्ती न केल्यामुळे मुलीचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे सदर दुर्घटनेला जबाबदार अधिकारी कर्मचाऱ्यांना तातडीने  निलंबित करून त्याच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शिवसेनेने केली आहे.