‘लस येत नाही तोवर कोरोनाशी युद्ध सुरूच ठेवायचंय’ : PM मोदी

पोलीसनामा ऑनलाइन – आता देश हळूहळू अनलॉक (Unlock) होत आहे. सर्व काही पूर्वपदावर येत आहे. अशात काही नागरिक बेफिकिर होत कोरोनाबाबतच्या (Corona) खबरदारीकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी देशाला संबोधित करत महत्त्वाचं आवाहन केलं आहे.

‘लस येत नाही तोवर कोरोनाशी युद्ध सुरूच ठेवायचं’

पीएम मोदी म्हणाले, “लस (Corona Vaccine) येत नाही तोवर कोरोनाशी युद्ध सुरूच ठेवायचं आहे. लस जेव्हा कधी येईल ती लवकरात लवकर प्रत्येक भारतीयांपर्यंत कशी पोहोचेल यासाठीही सरकारची पूर्ण तयारी सुरू आहे. देशातील प्रत्येक नागरिकांपर्यंत लस पोहोचावी यासाठी सरकारची तयारी झाली आहे.” असंही त्यांनी सांगितलं.

‘सावधगिरी बाळगून सगळे व्यवहार करा’

मोदी पुढं म्हणाले, “कोरोना विरोधातील लस विकसित करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. मात्र या सगळ्यात कोणीही निष्काळजीपणा केला तर त्यामुळं आपल्या आनंदावर विरजण पडू शकतं. सावधगिरी बाळगून सगळे व्यवहार करा.” असंही त्यांनी सांगितलं.

‘आपल्यापेक्षा अमेरिका आणि ब्राझिल यांची स्थिती वाईट’

मोदी म्हणाले, कोरोना संकटाशी आपण चांगला लढा दिला आहे. सणावारांचे दिवस आहेत. बाजारात काहीशी चमक दिसू लागली आहे. मात्र लॉकडाऊवन संपला असला तरीही व्हायरस गेलेला नाही हे विसरू नका. भारताने आपली स्थिती सावरली आहे. ती आपल्याला आणखी उंचवायची आहे. आता हळूहळू व्यवहार पूर्वपदावर येत आहेत. आपल्यापेक्षा अमेरिका आणि ब्राझिल यांची स्थिती वाईट आहे. हळूहळू सगळेच व्यवहार पूर्वपदावर येत आहेत.”

‘कोरोनाविरोधात लढताना जास्तीत जास्त चाचण्या करणं ही आपली खरी ताकद’

आज आपल्या देशात कोरोना रुग्णांसाठी 90 लाखांपेक्षा जास्त बेड्स उपलब्ध आहेत. 12 हजार क्वारंटाईन सेंटर्स (Quarantine Centres) आहेत देशातल्या चाचण्यांची संख्या 10 कोटींचा टप्पा ओलांडेल. कोरोनाविरोधात लढताना जास्तीत जास्त चाचण्या करणं ही आपली खरी ताकद आहे असंही मोदींनी सांगितलं.