‘निदान कोरोनाच्या काळात तरी सरकार अन् विरोधकांनी एकमतानं वागावं’

मुंबईः पोलीसनामा ऑनलाइन – देशभरात कोरोनाने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे राज्यात रेमडेसिवीरचा तुटवडा जाणवत असतानाच सत्ताधारी व विरोधकांत आरोप-प्रत्यारोपांचा शिमगा सुरू आहे. यावरून शिवसेनेने भाजपवर निशाणा साधला आहे. विधानसभा आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलेल्या एका फार्मा कंपनीच्या अधिकाऱ्याच्या सुटकेसाठी मध्यरात्रीच पोलीस ठाण्यात जातात याला काय म्हणावे ? ऑक्सिजनचे राजकारण झाले तसे रेमडेसिवीरचेही सुरू आहे. ठाकरे सरकारला हे इंजेक्शन हवे, ते त्यांना मिळत नाही, पण महाराष्ट्रातील भाजपचे उपरे पुढारी त्या औषध कंपन्यांकडून परस्पर रेमडेसिवीरचा साठा विकत घेतात अन् त्या कंपन्या हा साठा त्यांना परस्पर उपलब्ध करून देतात, हा अपराधच आहे. पण ही साठेबाजी व काळाबाजार कृत्ये पोलिसांनी उघड करताच भाजपचे लोक कढईतल्या गरम वड्यासारखे उकळून फुटू लागल्याचा टोलाही शिवसेनेने लगावला आहे. महाराष्ट्रासह देशभरात प्राणवायूअभावी कोरोना रुग्णांचा प्राण गुदमरला आहे. रेमडेसिवीरअभावी चिता पेटल्या आहेत. त्या चितांवर कोणीच राजकीय तवे शेकवू नयेत. सरकार व विरोधकांनी निदान याप्रश्नी तरी एकमताने वागावे असे आवाहन शिवसेनेने केले आहे.

राज्यात कोरोनाने धुमाकूळ सुरु असतानाही सत्ताधारी आणि विरोधकांत जुंपली आहे. प्राणवायूचा पुरवठा व रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा हे भांडणाचे कारण असले तरी यात लोकांचे बळी जात आहेत. महाराष्ट्राला रेमडेसिवीरचा पुरवठा करू नये म्हणून केंद्राने कंपन्यांवर दबाव आणल्याचा आरोप मंत्री नवाब मलिक यांनी केला. महाराष्ट्राला रेमडेसिवीर विकू नका, असे त्या कंपन्यांना केंद्राचे आदेश असतील तर मलिक यांनी जे सत्य समोर आणले. त्यानंतर केंद्रातील व महाराष्ट्रातील भाजपची फौज ठाकरे सरकारविरोधात उतरून सरकारच कसे अपयशी असल्याचे वक्तव्य करू लागली आहेत. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी तर प्राणवायूचा सर्वाधिक पुरवठा महाराष्ट्रालाच होत असूनही ठाकरे सरकार कोरोनाशी लढण्यात अपयशी ठरल्याचे म्हटले आहे. प्रश्न असा आहे की, महाराष्ट्राला सर्वाधिक प्राणवायू देऊन केंद्राने मोठी मेहेरबानी केली आहे का. मुंबईसह महाराष्ट्र तुमच्या म्हणजे केंद्राच्या तिजोरीत सर्वाधिक पैसा ओतत आहे. हा पुरवठा थांबला तर दिल्लीच्या नाका-तोंडाला प्राणवायूच्या नळकांड्या लावाव्या लागतील असा संताप शिवसेनेने व्यक्त केला आहे.

महाराष्ट्राने देशातील लोकांच्या पोटापाण्याची व्यवस्था सदैव केली. आजही करत आहे, पण आज महाराष्ट्र संकटात असताना केंद्रातले मंत्री दिल्या-घेतल्याच्या हिशेबाच्या चोपड्या फडकवून महाराष्ट्राला त्रास देत आहेत. ऑक्सिजनचे राजकारण सुरु झाले तसे रेमडेसिवीरचेही सुरू आहे. विरोधी पक्षनेते महाराष्ट्राची वकिली करण्याचे सोडून महाराष्ट्राला औषधे नाकारणाऱ्या फार्मा कंपनीची वकिली करीत आहेत. भाजपने हा रेमडेसिवीरचा साठा म्हणे विकत घेतला. मग हा साठा सरकारला का मिळू नये? केंद्राचा चाप लागल्याशिवाय फार्मा कंपन्या हा अपराध करायला प्रवृत्त होणार नाहीत. भाजपने औषधांची साठेबाजी करून नक्की काय करायचे ठरवले होते? भाजपने रेमडेसिवीर औषध विकत घेऊन फक्त त्यांच्या कोरोनाग्रस्त कार्यकर्त्यांनाच वाटायचे ठरवले होते की काय? हे सगळे प्रकरण चिंताजनक आहे. राजकारण कुठे करावे व कुठे करू नये याबाबत एखादा नैतिकतेचा धडा शालेय क्रमिक पुस्तकात नक्कीच असावा असे आता वाटते व हे धडे सगळ्यांसाठीच असावेत, असेही शिवसेनेने म्हटले आहे.