गाव पातळीवरील पोलिस पाटलांसाठी सरकारकडून घेण्यात आला ‘हा’ मोठा निर्णय

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – गावचा पोलीस पाटील हा गावपातळीवर पोलिसांचा प्रतिनिधी म्हणून काम पाहत असतो. आता सरकारने पोलीस पाटलांसाठी एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामध्ये पोलिस पाटलांना आता इतर सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच कलम ३५३ चे संरक्षण मिळणार आहे. कर्तव्य बजावत असताना पोलिस पाटलांना मारहाण झाल्यास संबंधित आरोपी विरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. राज्याच्या पोलिस महासंचालकांनी यासंबंधीच्या सूचना सर्व पोलिस ठाण्यांना दिल्या आहेत.

फार पूर्वीपासून राज्यातील पोलीस पाटलांकडून हि मागणी करण्यात येत होती. कलम ३५३ मध्ये जून २०१८ मध्ये बदल करण्यात आले. ते कलम पोलिस पाटलांनाही लागू करण्याची मागणी पोलीस पाटलांकडून करण्यात येत होती. या मागणीनंतर डिसेंबर २०२० मध्ये झालेल्या बैठकीत हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. त्या निर्णयानुसार पोलिस महासंचालकांनी सर्व पोलिस ठाण्यांना तसे आदेशसुद्धा दिले आहेत. गाव पातळीवर मानधनावर काम करणाऱ्या पोलिस पाटलांची एक राज्यस्तरीय संघटना देखील आहे. या संघटनेच्या विविध मागण्यांसाठी ३ डिसेंबर २०२० रोजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडून एक बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये मानधनात वाढ करण्यात यावी तसेच पोलिस पाटलांना कर्तव्य बजावताना मारहाण झाल्यास संबंधितांविरुध्द सरकारी कामात अडथळा आणल्याचा (कलम ३५३ नुसार) गुन्हा दाखल करण्याची मागणी या संघटनेकडून करण्यात आली होती. त्यावर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी हा निर्णय घेतला.

पोलिस पाटील हा सरकारचा शेवटचा प्रतिनिधी म्हणून गावपातळीवर काम करत असतो. गावात कायदा व सुव्यवस्था राखणे ही महत्त्वाची जबाबदारी पोलीस पाटलांवर असते. काही वेळा पोलिस पाटील आपले कर्तव्य बजावत असताना त्यांना अनेकदा मारहाणसुद्धा केली जाते. अशावेळी दोषींविरुध्द कडक कायदेशिर कारवाई करणे गरजेचे असते. आतापर्यंत पोलिस पाटलांचा समावेश सरकारी नोकरांमध्ये करण्यात येत नव्हता. त्यामुळे ३५३ हे कलम लावण्यात येत नव्हते. तसेच कलम ३५३ मध्ये ७ जून २०१८ रोजी या कलमामध्ये बदल करण्यात आला. या बदलांच्या आधारावर पोलिस पाटील लोकसेवक ठरतात त्यानुसार कर्तव्य बजावत असताना त्यांच्यावर हल्ला झाल्यास हे संरक्षण देण्यात येऊ शकते. त्यामुळे या पुढे पोलिस पाटील आपले कर्तव्य बजावत असताना जर त्यांना मारहाण झाली तर आरोपींविरूद्ध कलम ३५३ प्रमाणे अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात यावा, अशा सूचना सर्व पोलिस ठाण्यांना देण्यात आल्या आहेत.