गेल्या 8 वर्षात 750 वाघांचा मृत्यू, मध्य प्रदेशात सर्वाधिक

पोलिसनामा ऑनलाईन टीम – भारतात गेल्या आठ वर्षात शिकार आणि इतर कारणांमुळे 750 वाघांचा मृत्यू झाला आहे. मध्य प्रदेशात सर्वाधिक 173 वाघांचा मृत्यू झाला आहे. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने (एनटीसीए) माहिती अधिकार कायद्यांतर्गत विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती दिली आहे. तसेच 369 वाघांचा मृत्यू नैसर्गिक कारणांमुळे झाला आहे. तर शिकार केल्यामुळे 168 वाघांचा मृत्यू झाला आहे.

देशातील विविध राज्यात 2012 ते 2019 या आठ वर्षांच्या कालावधीत 101 वाघांचे अवशेषही देशभरात सापडले आहेत. 2010 मे ते 2020 या कालावधीत वाघाच्या मृत्यूबाबतची माहिती शेअर करण्याचे आवाहन करण्यात आले. यात 2012 पासून आठ वर्षांच्या कालावधीचे तपशील दिले गेले. पर्यावरण, वन व हवामान मंत्री प्रकाश जावडेकर यांनी डिसेंबरमध्ये सांगितले की, देशात मागील चार वर्षांत वाघांची संख्या 750 ने वाढली आहे आणि आता एकूण वाघांची संख्या 2 हजार 226 वरून 2 हजार 976 वर गेली आहे.

गेल्या 4 वर्षांत वाघांच्या संख्येत 750 ने वाढ झाली असल्याचे त्यांनी सांगितले आहे. एनटीसीएने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या आठ वर्षांत मध्य प्रदेशात सर्वाधिक 173 वाघांचा मृत्यू झाला. यापैकी 38 वाघांचा शिकार झाल्यामुळे मृत्यू झाला, तर 94 वाघांचा मृत्यू नैसर्गिक कारणांमुळे झाला आणि 19 वाघांच्या मृत्यूचा अद्याप तपास सुरू आहे. अनैसर्गिक कारणांमुळे सहा वाघांचा मृत्यू झाला आणि 16 अवशेषही सापडले.

देशात मध्य प्रदेशात सर्वाधिक 526 वाघ आहेत. मागील आठ वर्षांत वाघांच्या मृत्यूच्या प्रकरणात महाराष्ट्र दुसर्‍या स्थानवर आहे. येथे 125 वाघांचा मृत्यू झाला. त्यानंतर कर्नाटकात 111, उत्तराखंडमध्ये 88, तामिळनाडूमध्ये 54, आसाममध्ये 54, केरळमध्ये 35, उत्तर प्रदेशात 35, राजस्थानात 17, बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये 11 आणि छत्तीसगडमध्ये 10 वाघांचा मृत्यू झाला आहे.