लातूरमधील लॉकडाऊन 13 ऑगस्टपासून शिथील होणार, 17 ऑगस्टनंतर ’ट्रेस आणि टेस्ट’वर जोर

लातूर  : पोलीसनामा ऑनलाइन –    वाढते कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी लातूर जिल्ह्यामध्ये 1 ऑगस्टपासून लागू केलेला लॉकडाऊन आता येत्या 13 ऑगस्ट 2020पासून शिथिल करण्यात येणार आहे. तसेच 17 ऑगस्ट 2020 पासून हा लॉकडाऊन मागे घेण्यात येणार आहे. तसेच ट्रेस, टेस्ट आणि टेस्ट ही कार्यपद्धती स्वीकारण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक कार्य मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी आज दिलीय.

लातूर जिल्ह्यातील लॉकडाऊन संदर्भात बोलताना अमित देशमुख म्हणाले, लातूर जिल्ह्यात घोषित केलेला लॉकडाऊन हा प्रमुख्याने वाढते कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी होता. तसेच आरोग्य सेवासह वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळीचा सल्ला घेऊन लागू केला होता. लॉकडाऊन दरम्यान कार्यरत असणार्‍या यंत्रणांनी ट्रेस, टेस्ट आणि ट्रीट या त्रिसूत्रीचा अवलंब केल्याने त्याचे चांगले परिणाम दिसून आला आहे.

तसेच येत्या 17 ऑगस्ट 2020 पासून ट्रेस, टेस्ट आणि टेस्ट ही कार्यपद्धती स्वीकारण्यात येणार आहे. त्याच्या अंमलबजावणीत सर्व नागरिकांचे सहकार्य अपेक्षित आहे. कोरोनाशी सामना करताना शासन मागे नाही. आरोग्य सुविधा उपलब्ध करण्याबरोबरच लोकांत जागृती निर्माण करण्यात आपण यशस्वी झालो आहे. हात स्वच्छ धुणे, तोंडावर मास्क लावणे, तसेच सामाजिक अंतर पाळणे या बाबी आपणाला यापुढेही स्वीकाराव्या लागणार आहेत, असेही यावेळी त्यांनी सांगितले.

लातूर जिल्ह्यात कोरोना विषाणूची साखली तोडण्यासाठी जिल्हा आणि शहरांच्या सीमांवर अधिक दक्षता बाळगण्याचे काम संबंधित यंत्रणा करणार आहेत. जिल्ह्यासह शहरात प्रवेश करणार्‍यांच्या तपासण्या करण्यावर अधिक लक्ष दिले जाणार आहे.

कोरोना विषाणूचे वाढते संक्रमण रोखण्यासाठी सुमारे 1 लाख अँटिजन टेस्ट केल्या जातील. यासाठी खासगी लॅबचे ही सहकार्य घेतले जाणार आहे. कोणत्याही व्यक्तीला ही चाचणी करून घ्यावयाची असेल तर, ती सहजपणे करून घेता येणार आहे. कोरोनाच्या उपचारासाठी आता लातूर जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांनी ही पुढाकार घेतला आहे. याबद्दल वैद्यकीय शिक्षण मंत्री यांनी त्यांचे आभार मानले आहेत.

कोरोनाचा प्रादुर्भाव एवढ्यात संपणार नाही, कदाचित यासाठी आणखी वर्षभराचा कालावधी लागेल, असा अंदाज सर्वत्र व्यक्त केला जातोय. तर सर्वांनाच काळजी घ्यावी लागणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने अधिक प्रमाणात सुविधा उपलब्ध करुन दिल्यात. नागरिकांनीही आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवून अधिक काळजी घ्यावी, असे आवाहनही वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी केलंय.

येत्या 13 ऑगस्ट 2020 तारखेपासून लातूर जिल्ह्यातील लॉकडाऊन शिथिल होऊन 17 ऑगस्ट 2020 पर्यंत तो मागे घेण्यात येईल, असे असले तरीही पुरेशी दक्षता घेण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत नवीन नियमावली जाहीर केली जाणार आहे. हे नियम काटेकोरपणे पाळून जिल्हा यंत्रणा आणि शासनाला नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही अमित देशमुख यांनी केलंय.