रेल्वेच्या निष्काळजीपणा सुरुच ! 342 मजुरांना सोडून ट्रेन गेली पुढे

पोलीसनामा ऑनलाइन – लॉकडाऊनच्या काळात रेल्वे सातत्याने चर्चेत आहे. अनेक राज्यांमध्ये अडकून पडलेल्या मजुरांना घरी पोहचविण्यासाठी रेल्वेने पुढाकार घेतला आहे. मात्रा, त्यामध्ये काही बेपर्वाईच्या घटनाही समोर आल्या आहेत. अशीच एक घटना घडली असून महाराष्ट्रातून सुमारे 400 मजुरांना घेऊन एक रेल्वे गाडी ओडिशाला निघाली होती, मात्र ही गाडी झारखंड राज्यातील कानारोवा स्टेशनवर पोहचल्यानंतर, काही काळासाठी ही रेल्वे स्टेशनवरच थांबविण्यात आली. उन्हामुळे आणि सलग प्रवासामुळे कंटाळलेले सुमारे 350 प्रवाशांनी रेल्वेतून खाली उतरुन झाडांच्या सावलीचा आसरा घेतला. त्यातील काहीजणांनी खाण्यापिण्याच्या व्यवस्थेचा शोध सुरु केला. त्यावेळी रेल्वे सुरु झाल्यामुळे 342 प्रवाशांची रेल्वे चुकली गेली.

रेड झोन शहरांतून आलेल्या प्रवासी मजुरांची रेल्वे सुटल्याने स्थानिक प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. बानोचे गटविकास अधिकारी समीर सलखो यांच्या म्हणण्यानुसार, ‘या परिस्थितीला स्टेशन मास्तरांची बेपर्वाई जबाबदार आहे. मजुरांना राऊरकेला स्टेशनवर उतरायचे होते, पण आता हे मजूर कानारोवा स्टेशनवर उतरल्याने प्रशासनाच्या अडचणीत भर पडली आहे. जिल्हा प्रशासनाकडून आता या मजुरांना त्यांच्या अपेक्षित ठिकाणी पोहचविण्यासाठी बसची व्यवस्था करण्याचे काम करते आहे, त्याचबरोबर या मजुरांच्या खाण्यापिण्याची व्यवस्थाही करण्यात येते आहे.’

दुसरीकडे कानारोवाचे स्टेशन मास्तर कल्याण टोप्पो यांनी बेपर्वाईचा आरोप फेटाळला आहे. या रेल्वेसाठी हिरवा कंदिल दाखविण्यात आला होता, मात्र रेल्वेच्या इंजिनात झालेल्या बिघाडामुळे ड्रायव्हरने ही रेल्वे थांबविल्याचे त्यांचे म्हणणे आहे. दुरुस्तीनंतर या ड्रायव्हरने रेल्वे सुरु केली, त्याने प्रवासी नेमके कुठे आहेत, याकडे दुर्लक्ष केल्याचे स्टेशनमास्तरांचे म्हणणे हे. काही जणांनी चेन ओढून रेल्वे थांबविण्याचाही प्रयत्न केला, मात्र तरीही रेल्वे थांबली नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. स्टेशनवर राहिलेले 342 प्रवासी हे ओरिसातील भद्रक, कटक, भुवनेश्वरसह वेगवेगळ्या ठिकाणचे आहेत. आता त्यांना घरी पाठविण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.