१२ तास अडकलेल्या महालक्ष्मी एक्सप्रेसच्या प्रवाशांची सुटका करण्यास सुरुवात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – उल्हास नदीचे पाणी रेल्वे मार्गावर आल्याने गेल्या १२ तासापासून उल्हासनगर वांगणी रेल्वे स्टेशनच्या दरम्यान अडकून पडलेल्या महालक्ष्मी एक्सप्रेसच्या प्रवाशांची स्थानिकांच्या मदतीने सुटका करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

मुंबई व पुण्यातून एनडीआरएफची पथके रवाना झाली आहेत. त्यापैकी मुंबईतील पथक गाडीजवळ पोहचत आहे. हेलिकॉप्टरची मदत मागविण्यात आली आहे. पुण्यातील पथक या गाडीजवळ पोहचण्याचा प्रयत्न करीत आहेत. या गाडीत सुमारे २ हजार प्रवासी असून ते जवळपास १२ तास गाडीतच बसून आहेत. प्रवाशांनी गाडीतून खाली उतरु नये असे आवाहन रेल्वेने केले आहे.

शुक्रवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास महालक्ष्मी एक्सप्रेस आपल्या नियोजित वेळेनुसार छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलवरुन सुटली. ती कल्याण येथे साडेनऊ वाजता पोहचली. त्यानंतर ती पुढे निघाली. पण बदलापूर सोडल्यानंतर रेल्वे मार्गावर मोठ्या प्रमाणावर पाणी असल्याने रुळ दिसत नव्हते. पाण्याने भरलेल्या रेल्वे रुळावरुन गाडी नेणे धोकादायक असल्याने त्याने वाटेतच गाडी थांबविली. रात्री सव्वा दहा वाजल्यापासून ही गाडी बदलापूर ते वांगणी या दोन रेल्वे स्थानकाच्या मध्ये असलेल्या कासगावाजवळ अडकून पडली आहे.

या गाडीतील सुमारे २ हजार प्रवासी असून त्यांना आता पिण्याचे पाणी सुद्धा उरलेले नाही.
उल्हास नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने संपूर्ण रेल्वेमार्गावर पाणीच पाणी झाले असून परिसरातील रस्तेही पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे त्या ठिकाणापर्यंत पोहचण्यास खूप अडचण भेडसावत आहे.
या प्रवाशांची सुटका करण्यासाठी मुंबई व पुण्यातून एनडीआरएफची ९० जणांची टीम रवाना झाली आहे. त्यांच्याकडे एकूण ११ बोटी आहेत. मुंबईची टीम बदलापूरपर्यंत पोहचली असून तेथून ते प्रथम महालक्ष्मी एक्सप्रेसपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करणार आहे. प्रवाशांना सर्व प्रथम चहा देण्याचा प्रयत्न करण्यात येणार असून बोटीतून त्यांना नजीकच्या रेल्वे स्थानक अथवा जेथे पोहचणे शक्य होईल, तेथे नेण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. मध्य रेल्वेने या प्रवाशांना मदत करण्याचे स्थानिक सामाजिक संस्थांना आवाहन केले आहे.

आरोग्यविषयक वृत्त –