धक्कादायक ! विहिरीतील उंदरासाठी तिघांनी गमाविला जीव

पोलिसनामा ऑनलाईन – विहिरीत पडलेला उंदीर काढण्यासाठी गेलेल्या तीन मजुरांचा विषारी वायूने गुदमरून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना नागपूरमध्ये घडली आहे. मौदा तालुक्यातील वाकेश्वर या ठिकाणी ही घटना घडली. त्यामुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. आकाश पंचबुद्धे (वय 27) विनोद बर्वे (वय 37) आणि गणेश काळबांडे (वय 28) अशी मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे आहेत.

तिघेही बद्रीनारायण सपाटे यांच्या शेतात धान पिकांना सल्फेट देण्यासाठी गेले होते. दुपारच्या सुमारास विहिरीत उंदीर दिसल्याने एक मजूर उंदीर काढण्यासाठी विहिरीत उतरला. मात्र, तो बाहेर येत नसल्याने एकापाठोपाठ दोघेही उतरले. मात्र, विहिरीत असलेल्या विषारी वायूने तिघांचाही गुदमरून मृत्यू झाला. ही बातमी गावात पसरल्यावर गावकरी आणि पोलीस घटनास्थळी पोहचले. तिघांचेही मृतदेह बाहेर काढण्यात आले. ऐन पोळ्याच्या पाडव्याला तीन कुटुंबातील कर्ते पुरुष गेल्यानं कुटुंबासह गावावर शोककळा पसरली आहे.