ऑक्सिजनअभावी रुग्णाचा मृत्यू झाल्यास राज्य शासनाला जबाबदार धरले जाणार

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. दिवसागणिक रुग्णसंख्या वाढत असल्याने ऑक्सिनज, बेड, इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. आतापर्यंत ऑक्सिजन वेळेत न मिळाल्याने अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. दरम्यान यापुढे ऑक्सिजन अभावी कोणत्याही रुग्णाचा मृत्यू झाल्यास अन्न व औषधी विभागाचे सचिव आणि 4 नोडल अधिकाऱ्यांऐवजी राज्य शासनाला जबाबदार धरण्यात येईल, अशी दुरुस्ती मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने विभागीय आयुक्त आणि मुख्य सरकारी वकिलांच्या विनंतीवरून शुक्रवारी (दि. 21) केली आहे.

कोरोनानंतर आता Mucormycosis या आजाराचा धोका वाढला आहे. या आजारावरील इंजेक्शनसंदर्भात सोमवारी (दि. 24) पुढील सुनावणी होणार आहे. राज्य शासनाने 2 लाख 57 हजार 700 इंजेक्शनची ऑर्डर कंपनीला दिली आहे. इंजेक्शन मिळताच लवकरात लवकर जिल्हावार वितरण केले जाईल. तसेच, Mucormycosis च्या रुग्णांचा महात्मा फुले जनआरोग्य योजनेत समावेश केल्याचेही शासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.