‘ममता बॅनर्जी अन् केंद्रातील संघर्ष हा PM मोदी, HM शहा असेपर्यंत तरी संपणार नाही’

पोलीसनामा ऑनलाइन – पश्मिच बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि केंद्र सरकार यांच्यात इस्रायल अन् गाझा संघर्षाइतकाच तीव्र संघर्ष सुरु असून केंद्रात मोदी-शहा असेपर्यंत तरी हा संघर्ष संपेल असे वाटत नाही. बंगालच्या निवडणुका झाल्यानंतर त्याठिकाणी शांतता प्रस्थापित होईल, असे वाटले होते. पण तसे होताना दिसत नाही. निवडणुकीत झालेला पराभव देखील भाजप स्वीकारायला तयार नाही. केंद्रीय तपास पथकांच्या माध्यमांतून ममता बॅनर्जींवर हल्ले सुरूच ठेवले आहेत. या सगळ्यात पंतप्रधान मोदींचे नाव खराब होत आहे. ज्यांनी भाजपात प्रवेश करून ममतांच्या विरोधात निवडणुका लढवल्या ते सगळे नारदा भ्रष्टाचारात सामील असूनही आता शुध्द झाले. त्यामुळेच सीबीआयची कारवाई राजकीय सूडबुद्धीनेच प्रेरित आहे, असे म्हणायला जागा असल्याचे म्हणत शिवसेनेने सामनाच्या संपादकीयमधून केंद्रावर निशाणा साधला आहे.

कोलकात्यात सोमवारी जे घडले ते देशाच्या प्रतिमेला शोभणारे नाही. 2014 सालच्या नारदा स्टिंग प्रकरणात सीबीआयने तृणमूल कॉंग्रेसचे फिरहाद हकीम आणि सुब्रत मुखर्जी हे विद्यमान मंत्री, सोवन चॅटर्जी, आमदार मदन मित्रा आदी चौघांना अटक केली आहे. नारदा स्टिंग प्रकरणात राजकीय नेते पैसे स्वीकारत असल्याचा भ्रष्टाचार कॅमेऱ्यात टिपला गेला. हे गंभीर आहे, पण आश्चर्य असे की, या भ्रष्टाचारातील आणखी दोन आरोपी सुखेन्दू अधिकारी व मुकुल रॉय हे सध्या भाजपमध्ये आहेत. मी सुखेन्दू अधिकारी यांनाही पैसे दिले व तसे कॅमे-यात आहे. मग त्यांच्यावर कारवाई का होत नाही?’ हा प्रश्न आता ज्या नारदा न्यूजने स्टिंग ऑपरेशन केले त्याच्या संपादकाने केला आहे. ज्यांनी भाजपात प्रवेश करून ममतांच्या विरोधात निवडणुका लढवल्या ते सगळे नारदा भ्रष्टाचारात सामील असूनही आता शुध्द झाले. त्यामुळेच सीबीआयची कारवाई राजकीय सूडबुद्धीनेच प्रेरित आहे, असे म्हणायला जागा आहे.

गेल्या वर्षभरात ममता बॅनर्जी यांना नेस्तनाबूत करण्याचे सर्व अघोरी प्रयोग करून झाले आहेत. पण कोणतीही बंगाली जादू केंद्राला जमली नाही. बंगालात कोणत्याही मार्गाने अस्थिरता व अशांतता निर्माण करायची. ममता बॅनर्जींवर राजकीय अत्याचार करायचे व त्यासाठी राजभवनात बसलेल्या जगदीश धनकड यांचा निर्दयपणे वापर करायचा हे सूत्र ठरल्याचे दिसत आहे . ज्या 2 मंत्र्यांना व दोन आमदारांना सीबीआयने अटक केली आहे ते विधानसभेचे सदस्य आहेत. त्यांना अटक करण्याआधी विधानसभा अध्यक्षांची परवानगी घ्यावी लागते. पण तशी परवानगी घेतली गेली नाही.

पण राज्यपाल धनकड म्हणतात सीबीआयला आमदारांच्या अटकेची परवानगी आपण दिली आहे. हे राज्यपालांचे वागणे घटनाबाह्य आहे. बंगालात कोरोनाची लाट उसळली आहे. राज्यात लॉकडाऊन असताना सीबीआय पथकाला हे सर्व प्रकरण थोडे संयमाने घेता आले असते. ममता बॅनर्जी यांच्या लहान भावाचाही चार दिवसापूर्वी कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. पण सीबीआयला कोलकात्यात गोंधळ निर्माण करायचाच होता हे आता स्पष्ट झाले. ममता बॅनर्जी या निवडणुका जिंकून लोकशाही मार्गाने सत्तेवर आल्या. त्या लोकशाहीचा असा कचरा करणे बरे नसल्याचे शिवसेनेने म्हटले आहे.