शिक्षक हाच विद्यार्थ्यांच्या जीवनाचा खरा शिल्पकार : प्रवीण घुगे

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – विद्यार्थ्यांना फक्त पाठ्यपुस्तकातील धडे शिकवणे महत्त्वाचे नसून त्याचबरोबर त्या विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार पण होणे गरजेचे असून शिक्षक हाच विद्यार्थ्यांच्या जीवनाचा खरा शिल्पकार असल्याचे मत बालहक्क संरक्षण आयोग महाराष्ट्र शासनाचे अध्यक्ष प्रवीण घुगे यांनी व्यक्त केले. रोटरी क्लब व एकता फाउंडेशन उस्मानाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय शिक्षक रत्न पुरस्कार वितरण सोहळ्यांमध्ये ते बोलत होते. यावेळी राज्य पोलीस तक्रार प्राधिकरण महाराष्ट्र शासनाचे न्यायिक सदस्य उमाकांत मिटकर, आयकर विभाग सोलापूरचे सहआयुक्त विश्वास मुंडे, अपर पोलीस अधीक्षक संदीप पालवे, रोटरी क्लब अध्यक्ष सुधाकर भोसले, एकता फाउंडेशन अध्यक्ष अमित कदम, अभिजित काकडे व सुरज कदम यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.

रोटरी क्लब व एकता फाउंडेशन उस्मानाबाद या स्वयंसेवी संस्थांनी हा शिक्षकांच्या सत्कार सोहळ्याबरोबरच वॉटर कप स्पर्धेतील पारितोषिक विजेते गाव व युवा संघाचा सन्मान हा त्रिवेणी संगम  घडून आणला आहे तो अतिशय कौतुकास्पद असून विद्यार्थ्याच्या मनातील भावना समजून शिक्षक-विद्यार्थी घडवत असतो हे फार मोठे पुण्याचे काम तो शिक्षक करत असतो असेही मत यावेळी प्रवीण घुगे यांनी व्यक्त केले.

ज्याच्याकडे पाहून मी घडलो व आज इथपर्यंत आलो तो केवळ शिक्षकांमुळे त्यामुळे माणूस घडविण्यामधला दुवा म्हणजे शिक्षक असतो असे मत राज्य पोलीस तक्रार प्राधिकरण महाराष्ट्र शासन न्यायिक सदस्य उमाकांत मिटकर यांनी व्यक्त केले. ज्याप्रमाणे शिक्षक विद्यार्थ्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप ठेवतो त्याप्रमाणे रोटरी क्लब व एकता फाऊंडेशन परिवाराने या गुणवंत शिक्षकांना त्यांनी आजपर्यंत केलेल्या कामाबद्दल या  सत्कार सोहळ्यातून शिक्षकांचे कौतुक करत आहेत हे अतिशय अभिनंदनीय बाब असल्याचे  असेही उमाकांत मिटकर बोलताना म्हणाले.

ज्या शिक्षकांमुळे आम्ही घडलो त्या शिक्षकांना आज आमच्या हस्ते सन्मानित केले जात आहे हि बाब आमच्यासाठी अतिशय अभिमानास्पद असून शिक्षक पेशा हा जगातील सर्वात मौल्यवान पेशा आहे असे मत सह आयुक्त आयकर विभाग सोलापूर से विश्वास मुंडे यांनी व्यक्त केले. यावेळी विश्वास मुंडे यांनी आपल्या स्वतःच्या विद्यार्थी जीवनातील अनुभव सांगताना अश्रू अनावर झाले व विद्यार्थी बरोबरच शिक्षकांनी पण स्पर्धा परीक्षेची तयारी साठी विशेष परिश्रम घेऊन जास्तीत जास्त विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण कसे होतील याकडे लक्ष  देऊन शिक्षकांनी शिक्षक म्हणून नव्हे तर आचार्य बनवून विद्यार्थी घडवावे असे ही भावना यावेळी विश्वास मुंडे यांनी व्यक्त केली.

शिक्षकांमुळे माणूस सन्मान योग्य बनत असून त्या शिक्षकांचे ऋण व्यक्त करण्यासाठी व त्या शिक्षकांना प्रोत्साहन मिळावे याबदल रोटरी व एकता फाऊंडेशन ने जो कार्यक्रम आयोजित केला आहे तो अतिशय कौतुकास्पद असून आज मला जे काही साध्य करायचे होते ते मी साध्य केले आहे आणि हे सर्व शक्य झाले ते केवळ शिक्षकांमुळे असे मत अपर पोलीस अधीक्षक संदीप पालवे यांनी मांडले.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविक पर भाषणात सुधाकर भोसले यांनी कार्यक्रमाच्या आयोजना मागील भूमिका विषद करत आजपर्यंतचा रोटरी क्लब व एकता फाऊंडेशन च्या कार्याचा आढावा सांगितला.कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत व वृक्षाला पाणी घालून करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन आभिलाष लोमटे यांनी केले. यावेळी उमाकांत मिटकर व आकाश मगर यांना गोरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी पवार पोपट, तांबे राजू, तांबे बालाजी, देशमुख अनिता, सूर्यवंशी विशाल, चव्हाण संजय, दबडे तानाजी, शेख शाहीरअली, पाचंगे विक्रम, घाटगे गोविंद, भागवत प्रशांत, खेंदाड हरिश्चंद्र, सोनवणे दीपक, कांबळे अरुण, संदीकर धनंजय, पवार लता, इंगळे विष्णू, जगताप राजा, चौगुले भगवान, देशमुख विक्रमसिंह या शिक्षकांना शिक्षकरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

त्याचबरोबर उस्मानाबाद जिल्ह्यातील वॉटर कप स्पर्धेमध्ये पारितोषिक विजेते कळंब व उस्मानाबाद तालुक्यातील गावांचा भाटशिरपुरा, मस्सा खंडेश्वरी, सातेफळ, डकवाडी, वलगुड, नितळी व ग्रामसेवक युवा संघ खेड, बेंबळी व तेर या सर्वाचा यावेळी शाल, सन्मानचिन्ह, सन्मानपञ व पुस्तक भेट देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी रोटरी क्लब व एकता फाऊंडेशन चे सर्व पदाधिकारी,सदस्य व मिञपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.