चंद्रपूर : लग्नकार्य आटोपून परत येताना टेम्पो उलटून झालेल्या अपघातात चौघांचा मृत्यू

चंद्रपूर : पोलीसनामा ऑनलाइन – लग्नकार्य आटोपून परतणाऱ्या वऱ्हाडींच्या टेम्पोला मोठा अपघात झाला. यामध्ये 4 जण ठार झाले असून, सुमारे 20 जण जखमी झाले आहेत. हा अपघात चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यात घडला. हे सर्व वऱ्हाडी रत्नापूर येथून विवाह आटोपून एकारा येथे जात होते.

चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील कच्चेपार गावाजवळ ही घटना घडली आहे. विवाह सोहळा आटोपून हे वऱ्हाड कच्चेपार गावाजवळ पोहोचले होते. त्यादरम्यान टेम्पो चालकाचे गाडीवरील नियंत्रण अचानक सुटले. त्याचदरम्यान टेम्पो रस्त्याच्या बाजूला जाऊन उलटला. कच्चेपार येथे झालेला हा अपघात इतका भीषण होता, की टेम्पोच्या खाली काहीजण दबले गेले होते आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला असून, वाहन चालकासह 4 जणांचा समावेश आहे. तसेच सुमारे 20 वऱ्हाडी अपघातात जखमी झाले आहे.

दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांसह या मार्गावरून जाणाऱ्या वाहनचालकांनी तातडीने मदत मिळावी म्हणून जखमींना सिंदेवाही रुग्णालयात नेले. सध्या यातील जखमींवर उपचार केले जात आहेत.