…तर पंतप्रधान नरेंद्र मोदींना राजीनामा द्यावा लागेल : खा. संजय राऊत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसमुळे जगभरातील दहा कोटी लोकांची कमाई बंद झाली आहे, 40 कोटी कुटुंब कोरोनामुक्त प्रभावित झाली आहेत. जर लोकांच्या नोकऱ्या जाण्याच्या समस्येवर तोडगा निघाला नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीनामा द्यावा लागू शकतो, असे मत शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे. सामनाच्या रोखठोक सदरात संजय राऊत यांनी हे विधान केले आहे. संजय राऊत म्हणाले की, मध्यमवर्गीय लोकांच्या नोकऱ्या गेल्या, व्यापार आणि उद्योगांचे तब्बल 4 लाख कोटी रुपयाचे नुकसान झाले. लोकांच्या सहन करण्याची मर्यादा असते, ते फक्त अपेक्षा आणि आश्वासनावर जिवंत राहू शकत नाहीत. जरी प्रभू रामाचा वनवास संपलेला असेल तरी सध्या कठीण काळ आहे. हे पंतप्रधानांना माहित आहे. कोणालाही आपल्या आयुष्यात यापूर्वी असुरक्षित वाटलं नसेल, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

इस्त्रईलमध्ये पंतप्रधानांच्या विरोधात शक्ती प्रदर्शने सुरु आहे. कोरोना महामारी आणि जागतिक आर्थिक संकटाशी लढण्यास असमर्थ राहिल्याने लोकांनी पंतप्रधानांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. भारतातही हे पहायला मिळू शकतं असं सांगत राफेलच्या आधी भारतात सुखोई, एमआयजी विमान आणली गेली. पण राफेलसारखा जल्लोश कधी केला नाही, या राफेल विमानामध्ये बेरोजगारी आणि आर्थिक आव्हानाचं संकट संपवण्याची क्षमता आहे का ? असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.

भाजप नेत्या प्रज्ञा ठाकूर यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना राऊत म्हणाले, हनुमान चालिसा पठन केल्याने कोविड -19 महामारी संपुष्टात येईल मग हे खरे असले तर हनुमान चालिसा पठनाने रोजगार गमावलेल्या 10 कोटी लोकांना जगण्यापूरतं तरी काम मिळेल का ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान राजस्थानात गहलोत सरकार पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा सांगतात महाराष्ट्रात भाजपा स्वबळावर सत्ता आणणार पण कोणीही कोरोना संकट, बेरोजगारी यावर चर्चा करत नाही. कोणालाच कोरोना विरुद्ध कसे लढायचे हे माहिती नाही असा आरोप संजय राऊत यांनी भाजपवर केला.