‘माणसांकडून चुका होतातच, त्या घेऊन न बसता पुढे गेले पाहिजे’

मुंबई : वृत्तसंस्था- भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली यांनी राहुल-पांड्या वादावर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. माणंसाकडून चुका होतातच, त्या आपण घेऊन न बसता पुढे गेले पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. हार्दिक पांड्या आणि केएल राहुल यांच्यावर सर्व बाजूने टीकेचा भडीमार सुरू असतानाच भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने या दोघांची पाठराखण केली आहे. माणसांकडून चुका होतात, त्यांना पुन्हा संधी द्यायला हवी असे गांगुली यांनी म्हटलं आहे.
सौरव गांगुली यांना असा प्रश्न विचारण्यात आला होता की, सध्याच्या क्रिकेटपटूंनी बोलताना सावध राहिलं पाहिजे का? यावर त्यांनी उत्तर दिले. ते म्हणाले की, “माणसांकडून चुका होतात, त्यामुळे आपण आता पुढे गेलं पाहिजे आणि या चुका पुन्हा होणार नाहीत, याची त्यांनी काळजी घेतली पाहिजे, मी तो कार्यक्रम बघितला नाही. पण फक्त सध्याच्या क्रिकेटपटूंनी जबाबदारीनं वागलं पाहिजे. प्रत्येकजण आयुष्यात चुका करतोच. राहुल-पांड्याचा वाद ताणण्यात अर्थ नाही.”
पुढे बोलताना गांगुली म्हणाला की, “आपण मशीन नव्हे माणूस आहे, त्यामुळे चुका होतात. चुका सुधारण्याची संधी आपण दिली पाहिजे. या सगळ्या वादानंतर चूक त्यांच्या लक्षात येईल आणि ते आणखी चांगली माणसं म्हणून समोर येतील. राहुल-पांड्या दोघंही जबाबदार व्यक्ती आहेत. दोघंही अनेकांचे रोल मॉडेल आहेत. याशिवाय, प्रत्येकवेळी चांगल्या प्रदर्शनाचा दबाव असतो. काही चुका आयुष्यात होतात, त्या घेऊन बसण्यापेक्षा सोडून दिलेल्या बऱ्या, असं सल्ला गांगुली यांनी दिला आहे.
काय आहे प्रकरण ?
क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि लोकेश राहुल  ‘कॉफी विथ करण’ या मुलाखतीच्या शो दरम्यान महिलांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल त्यांच्यावर चौकशी संपेपर्यंत निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. करण जोहरच्या या कार्यक्रमात महिला आणि वैयक्तिक आयुष्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करण्यात आली. यानंतर बीसीसीआयनं दोन्ही क्रिकेटपटूंना ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून परत भारतात बोलावलं. चौकशी पूर्ण होईपर्यंत दोन्ही खेळाडू कोणत्याच प्रकारचं क्रिकेट खेळू शकणार नाहीत.