नियमांचं पालन केलं ! महाराष्ट्रातील ‘या’ 9 जिल्ह्यात कोरोनाचा एकही रूग्ण नाही

मुंबई, पोलीसनामा ऑनलाईन : कोरोना विषाणूने देशभरात थैमान घातले आहे. देशात अनेक राज्यांपैकी महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. राज्यात आतापर्यंत १५७४ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर ११० लोकांचा मृत्यू झाला आहे. राज्यात मुंबईमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या इतर शहरांच्या मानाने अधिक आहे. मुंबईत आतापर्यंत १००८ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे तर यामध्ये ६४ लोकांचा मृत्यू झाला आहे. असे असूनही महाराष्ट्रातील ९ जिल्हे असे आहेत जिथे कोरोना विषाणूचा एकही रुग्ण आढळलेला नाही.

या ९ जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा एकही बळी नाही

महाराष्ट्रात धुळे, नंदुरबार, सोलापूर, नांदेड, परभणी, वर्धा, भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली या नऊ जिल्ह्यांमध्ये अजून कोरोनाने शिरकाव केलेला नाही. शासनाने राबवलेल्या जिल्हाबंदीचे या जिल्ह्यांनी कडक पालन केले आहे. या जिल्ह्यांमधील गावातील कुठलीही व्यक्ती गावाबाहेर जाऊ नये आणि बाहेरील व्यक्ती गावात येऊ नये, याची पुरेपूर दक्षता घेण्यात आली आहे. गावकऱ्यांनी गावाच्या सीमा बंद केल्या आहेत. त्यामुळे बाहेरील व्यक्ती हा गावात येऊ शकत नाही.

दरम्यान महाराष्ट्रात पहिला कोरोनाचा रुग्ण हा पुण्यात ९ मार्च २०२० रोजी आढळून आला होता. त्यानंतर रुग्णांची वाढ होत असल्याने २३ मार्च ला संपूर्ण राज्यात संचारबंदी लागू करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती. त्यानुसार राज्याच्या सर्व सीमा सील करण्याचा निर्णय राज्यसरकारने घेतला होता. तसेच राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या सीमा देखील सील केल्या होत्या.

राज्यात लागू केलेल्या संचारबंदीमुळे सर्वांनी घरी बसणे सक्तीचे करण्यात आले. तसेच शासनाने नागरिकांची उपासमार होऊ नये म्हणून रेशन दुकानावर तीन महिन्यांचे अन्नधान्य देण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच परिस्थिती बिकट झाल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी १४ एप्रिलला संपूर्ण देशभरात २१ दिवसांचे लॉकडाऊन जाहीर केले. परंतु सध्याला दिवसेंदिवस कोरोनाची संख्या वाढतच आहे त्यामुळे लॉकडाऊन वाढण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. या संदर्भात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात आज चर्चा होणार असल्याचे समोर येत आहे.