‘त्या’ स्फोटकामागे कोणताही दहशतवादी अँगल नाही; NIA च्या दिल्ली स्पेशल सेलचा मोठा खुलासा
मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळील कारमायकल रोडवर जिलेटिन कांड्या, धमकीचे पत्र याच्याशी दहशतवादाचा दुरवरुनही संबंध नसल्याचा खळबळजनक खुलासा एनआयए च्या दिल्ली स्पेशन सेलने केला आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे.
या प्रकरणाची जबाबदारी जैश अल हिंद संघटनेने घेतल्याचा मेसेज टेलिग्रामवर प्रसिद्ध झाला होता. मात्र, हा मेसेज म्हणजे निव्वळ खोडसाळपणा असल्याचे एनआयएच्या तपासात समोर आले आहे. त्याचवेळी जिलेटिन कांड्या असलेली ही कार तेथे का ठेवण्यात आली होती, यामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
हा मेसेज दिल्लीतील तिहार तुरुंगात असलेल्या एका कुख्यात गुन्हेगाराने मोबाईलवरुन पाठविल्याचे निष्पन्न झाले होते. त्यावरुन एनआयएने हा मोबाईल जप्त केला होता. त्या गुन्हेगाराची चौकशी केली, तेव्हा त्याने केलेला खुलासा ऐकून पोलीस अधिकारी अवाक झाले.
देशात इतकी मोठी घटना घडली तरी त्याची जबाबदारी कोणी न घेतल्याने आपण हा मेसेज पाठवून त्याची जबाबदारी स्वीकारल्याचे त्याने सांगितले.
त्यानंतर पुन्हा जैश अल हिंद याच्या नावाने एक मेसेज पाठविण्यात आला होता. त्यात आमच्यापासून मुकेश अंबानी यांना कोणताही धोका नाही. आमची लढाई अंबानींशी नाही तर आम्ही निरपराध मुस्लिमांना त्रास देणार्या नरेंद्र मोदींविरुद्ध लढत आहोत. धर्मनिरपेक्ष लोकशाहीविरुद्ध लढत असल्याचा खुलासा करण्यात आला होता.
एनआयएने केलेल्या चौकशीत या गाडीच्या प्रकरणात दहशतवादाचा दूरवरुनही संबंध नसल्याचे आढळून आले आहे़