आरोग्य राज्यमंत्र्यांनी वाटला ‘कोरोना’चा ‘प्रसाद’ ? : जयंत पाटील

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांना कोरोना होऊन गेल्याचे समजले नाही. नुकत्याच केलेल्या चाचणीत त्यांच्यामध्ये अँटीबॉडिज तयार झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्यांनी कोरोनाचा अनेकांना प्रसाद वाटला असणार हे नक्की, मात्र यामध्ये त्यांचा काही दोष नाही. सर्वांनाच जवळ घ्यायची आमच्या कडील नेत्यांना सवय आहे. त्यामुळे असे घडते, असे मत जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केले आहे.

सांगलीत एका डेडिकेटेड कोविड रुग्णालयाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले की, आरोग्य राज्यमंत्र्यांनी मला आताच सांगितले की त्यांना कोरोना होऊन गेला आहेत त्यांच्यात आता अँटीबॉडिज तयार झाल्या आहेत. हा आजारच असा आहे की, काहींना तो होऊन गेल्याचे कळत नाही. तोपर्यंत ते प्रसाद वाटत असतात. आरोग्य राज्यमंत्र्यांनी देखील कितीजणांना तरी प्रसाद वाटला असणार, मात्र त्यात त्यांचा व प्रसाद घेणाऱ्यांचा काही दोष नाही. त्यामुळे नेत्यांनी काळजी घेतली पाहिजे. आमच्याकडील नेत्यांना प्रत्येकास कडेवर घ्यायची सवय लागली आहे. आता ती सवय बदला असा सल्ला त्यांनी यावेळी दिला.

डॉक्टरांच्या कामाचे ऑडिट करण्याची गरज

कोरोना संसर्गाच्या भीतीने डॉक्टरां कडून रुग्णांवर योग्य पद्धतीने उपचार होत नाहीत. अनेक ठिकाणी रुग्ण आत आणि डॉक्टर बाहेर अशी स्थिती आहे. त्यामुळे मृत्यूदर वाढत आहे. ही स्थिती अशीच सुरु राहिल्यास रुग्णालयांच्या बिलांसह डॉक्टरांच्या कामाचे ऑडिट करावे लागेल, असे मत जयंत पाटील यांनी व्यक्त केले. खासगी रुग्णालयांकडून होणाऱ्या रुग्णांच्या लुटीबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली. दक्षिण भारत जैन सभेच्या वतीने सुरु केलेल्या कोविड रुग्णालयाच्या उद्घघाटनप्रसंगी ते बोलत होते.