प्रसिद्धीसाठी, राजकीय सनसनाटी निर्माण करण्याचा भाजपचा हा केविलवाणा प्रयत्न; अजित पवारांचे सडेतोड प्रत्युत्तर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  हैदराबादस्थित भारत बायोटेक कंपनीला पुण्यात लस निर्मिती प्रकल्पासाठी जागा देण्यात आली असून, सरकारने 28 एकर जागा कंपनीला हस्तांतरित केली आहे. यावरुन भाजपचे आमदार कृष्णा खोपडे यांनी अजित पवारांनी नागपूर मधील भारत बायोटेकचा प्रकल्प राजकीय वजन वापरून पुण्याला पळवून नेल्याचा आरोप केला. खोपडे यांच्या आरोपांना अजित पवार यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. खोपडे यांचा आरोप तद्दन खोटा, जनतेची दिशाभूल करणारा, औट घटकेच्या प्रसिद्धीसाठी, राजकीय सनसनाटी निर्माण करण्यासाठी केलेला केविलवाणा प्रयत्न आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.

पुण्याच्या हवेली तालुक्यातील मांजरी येथील जागा भारत बायोटेक कंपनीला कोरोना लस निर्मिती प्रकल्पासाठी देण्याचे खुद्द मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश आहेत. उच्च न्यायालयाच्या आदेशांचे पालन होईल हे पाहण्याची जबाबदारी पुणे जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने माझी जबाबदारी आहे. आणि ती जबाबदारी मी पार पाडली आहे. भारत बायोटेकचा लसनिर्मिती प्रकल्प पुणे, नागपूरसह राज्यात कोठेही झाला असता तरी मला आनंदच झाला असता. त्यामुळे आमदार कृष्णा खोपडे यांचा आरोप तद्दन खोटा असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

भारत बायोटेकने पुण्यात जागा मागितली

अजित पवार पुढे म्हणाले, देशावरील कोरोना संकट आणि लसनिर्मितीची गरज लक्षात घेऊन भारत बायोटेक लस उत्पादक कंपनीने स्वत:हून पुण्यात लसनिर्मिती प्रकल्पासाठी जागा मिळावी अशी मागणी केली होती. त्यासाठी मांजरी येथील बंद पडलेल्या इंटरवेट इंडिया प्रा. (बायोवेट) कंपनीच्या जागेसाठी सरकारकडे अर्ज केला होता. तसेच लवकरात लवकर जागा मिळावी यासाठी भारत बायोटेकने उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

मी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले

उच्च न्यायालयाने कोरोनाचे संकट व लसनिर्मितीची गरज लक्षात घेऊन पुण्याच्या हवेली तालुक्यातील मांजरी येथे भारत बायोटेकचा प्रकल्प सुरु करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार त्यांना जागा देण्यात आली आहे. न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्याची जबाबदारी मी पार पाडली. भारत बायोटेकचा प्रकल्प पुण्यात न्यायालयाच्या आदेशाने सुरु होत आहे, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.

खोटे बोलून दिशाभूल करु नका

कोरोनाविरुद्धच्या लढ्यात संपूर्ण महाराष्ट्र एकजुटीने लढत आहे. चांद्यापासून बांद्यापर्यंत संपूर्ण महाराष्ट्र एक असून राज्याच्या प्रत्येक जिल्ह्याचा, विभागाचा औद्योगिक, आर्थिक, पायाभूत विकासासाठी महाविकास आघाडी सरकार बांधील आहे. विरोधकांनी खोटे, तथ्यहीन आरोप करुन जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न आता थांबवावा, असे आवाहनही अजित पवार यांनी केले आहे.