सुबोध भावेनं ‘ती’च्यासाठी रक्ताने लिहिलं होतं पत्र

मुंबई : पोलीसनामा आॅनलाईन – अनेक वेगवेगळे बायोपिक करणारा अभिनेता सुबोध भावेचा चाहता वर्ग दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. इतकंच नाही तर आपण मराठी इंडस्ट्री पाहिली तर  सुबोध भावे हे नाव चांगलंच चर्चेत असल्याचं दिसत आहे. मुख्य म्हणजे नुकताच प्रदर्शित झालेला ‘आणि..डॉ. काशिनाथ घाणेकर’ या चित्रपटामुळे सुबोधने चाहत्यांची मनं जिंकली आहेत. परंतु आता सुबोध आयुष्यातील एक खास किस्सा समोर आला आहे. जे अनेकजणांना आतापर्यंत ठाऊकही नसेल. ‘आणि..डॉ. काशिनाथ घाणेकर’ या चित्रपटातील सहकलाकार प्रसाद ओकसोबत सुबोधने नुकतीच एका कार्यक्रमात हजेरी लावली. ‘नवरा असावा तर असा’ या चॅट शोमध्ये प्रसाद ओक आणि सुबोध भावे पत्नीसोबत उपस्थित होते.
या शोमध्ये दोघांनीही त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील बऱ्याच गोष्टी मोकळेपणाने सांगितल्या. आश्चर्याची बाब म्हणजे कॉलेजमध्ये असताना आपण प्रेयसीला रक्ताने पत्र लिहिल्याचा धक्कादायक खुलासा सुबोधनं यावेळी केला. हा त्याच्या खासगी आयुष्यातील किस्सा बऱ्याच जणांना माहीत नसेल.
काय आहे सुबोधची स्टोरी ?

सुबोधने बालमैत्रीण मंजिरी ओक हिच्याशी लग्न केलं. शालेय वयापासून सुबोधला मंजिरी आवडत होती. तिला आपल्या प्रेमाची कबुली दिल्यावर तिनेही सुबोधला होकार दिला. त्यांचं हे प्रेमप्रकरण बरीच वर्षे सुरु राहिलं. कॉलेजला असताना सुबोधला सिगारेटचं व्यसन होते. मंजिरीला मात्र ही गोष्ट अजिबात आवडत नसे. असंच एकदा ते भेटले असताना सुबोधने सवयीप्रमाणे सिगारेट पेटवली. हे बघताच मंजिरी नाराज होत काहीच न बोलता तिथून निघून गेली.

सुबोधला त्याच्या या कृत्याचा खूप पश्चाताप झाला. पुन्हा कधी हे व्यसन करायचं नाही हे त्याने मनाशी पक्कं ठरवलं. हेच वचन त्याने मंजिरीलाही दिलं. पण अत्यंत फिल्मी स्टाईलने. त्याने चक्क स्वतःच्या रक्ताने तिला पत्र लिहून माफी मागितली आणि पुन्हा असं न करण्याचं वचन दिलं. सुबोध सांगतो आजही त्याच्या हातावर त्या जखमेच्या खुणा आहेत. सुबोध आणि मंजिरी अठरा वर्षांपासून सोबत आहेत आणि त्यांना दोन मुलंही आहेत.https://www.instagram.com/p/Bp_cGKhnVXX/?utm_source=ig_embed