वृक्षारोपणांसाठी यंदा नवा ‘फंडा ‘ ; ‘जेवढी मतं तेवढी झाडे

मुंबई : वृत्तसंस्था – पर्यावरण समतोलासाठी लोकसहभागातून वृक्षलागवडीला चालना देण्यासाठी यंदा लोकसभा निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांनी ‘जितकी मते तितकी झाडे ‘ लावून पर्यावरण रक्षणाप्रती कर्तव्य बजावल्याच्या अनोख्या उपक्रमाची दखल घेऊन महाराष्ट्राचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी लोकसभा सदस्य, राज्यसभा सदस्य आणि आमदारांना साद घातली आहे. यंदा वनविभागाने ३३ कोटी वृक्षलागवडीचे टार्गेट ठेवले आहे. या पार्श्वभूमीवर वनमंत्री मुनगंटीवार यांनी जितकी मते तितकी झाडे हा उपक्रम राज्यात सर्वत्र राबविण्यासाठी पत्राद्वारे आवाहन केले आहे.

यासंदर्भात लोकप्रतिनिधींना पाठवलेल्या पत्रात मुनगंटीवार यांनी म्हटले आहे कि, वन विभागाने लोकसहभागातून ५० कोटी वृक्षलागवडीचे मिशन हाती घेतले आहे. मागील वर्षात राज्यात २ कोटी वृक्षलागवडीच्या संकल्पाची २ कोटी ८२ लाख रोपे लावून, ४ कोटी वृक्षलागवडीची ५ कोटी ४३ लाख रोपे लावून तर १३ कोटी वृक्षलागवडीची १५ कोटींहून अधिक रोपे लावून पूर्तता झाली आहे.

लोकसहभागातून दरवर्षी साजऱ्या होणाऱ्या या वृक्षोत्सवात यावर्षी आपल्या सर्वांना मिळून ३३ कोटी वृक्ष राज्यात लावायचे आहेत. आपल्या सर्वांच्या सहकार्यातून दुष्काळाला हद्दपार करतांना सुजल आणि हरित महाराष्ट्राची वाटचाल यशस्वी होणार आहे. जुलै ते सप्टेंबर २०१९ या कालावधीत होणाऱ्या वृक्षलागवड मोहिमेत समाजातील सर्व घटक सहभागी होणार आहेत.

सर्व लोकप्रतिनिधींनी आतापर्यंतच्या वृक्षलागवड कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेतला आहेच परंतू यावेळेस काही खासदारांनी सुरु केलेला ‘मतांएवढी रोपे’ हा उपक्रम वृक्षलागवडीच्या वाटचालीला अधिक सशक्त करणारा आहे. इतर खासदार- आमदारांनी आणि लोकप्रतिनिधींनी वृक्षलागवडीच्या मोहिमेचे अशाप्रकारे नेतृत्व करावे आणि ३३ कोटी वृक्षलागवडीचे’वृक्ष धनुष्य’ उचलण्यात योगदान द्यावे, असे आवाहन वनमंत्र्यांनी सर्व खासदार-आमदारांना पाठवलेल्या पत्रातून केले आहे.नवनिर्वाचित खासदार ओमराजे निंबाळकर व राहुल शेवाळे यांनी या धर्तीवर केलेल्या वृक्षलागवडीचेही मुनगंटीवार यांनी कौतुक केले आहे.