यंदा लोकसभा निवडणुकीचे निकाल हाती येण्यास उशीर होणार

दिल्ली : वृत्तसंस्था – देशभरातील 543 पैकी 542 मतदारसंघाच्या मतमोजणीला 23 मे रोजी सकाळी 8 वाजता सुरुवात होणार असून यंदा निकाल हाती येण्यास मात्र उशीर होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

सुरुवातीला पोस्टल मतांची त्यानंतर अर्ध्या तासाने ईव्हीएमची मोजणी होईल. एकाच वेळी जास्तीत जास्त 14 ईव्हीएमची मोजणी केली जाते.

सकाळी अर्ध्या तासानंतरच कल हाती येण्यात सुरुवात होईल. मात्र अंतिम निकाल हाती येण्यासाठी शुक्रवारची (दि.24) पहाट उजाडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे सत्तेची सूत्रे कोणाकडे यावर २४तारखेला शिक्कामोर्तब होईल.

उशीर का होणार?
प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून 1 याप्रमाणे 5 मशीनमधील स्लिपची मोजणी शेवटी करण्यात येणार आहे. व्हीव्हीपॅटच्या या मोजणीसाठी अतिरिक्त 5 तास लागणार, यामुळे अंतिम निकाल हाती येण्यासाठी रात्री 2 सुद्धा वाजू शकतात
जर कोणी हरकत घेतली तर मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यावर निर्णय घेतला जाईल त्यामुळे यंदा उशीर होणार असल्याचे संकेत मिळत आहे.