वाढत्या उष्णतेमुळे हजारो कोंबड्यांचा मृत्यू !

पालघर : पोलीसनामा ऑनलाईन – गेल्या आठ दिवसांपासून विक्रमगड तालुक्यात तापमानामुळे माणसांप्रमाणेच पशू- पक्षीही हैराण झाले आहेत. उष्णतेमुळे विक्रमगड तालुक्यातील कुर्झे येथील दोन पोल्ट्री फार्ममधील 750 हुन अधिक कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान उष्णतेचा पारा 42 अंशावर गेल्यामुळे उन्हाने लहान मुलांच्या आजारातही वाढ झाली आहे. तर पोल्ट्री फार्ममधील कोंबड्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. विक्रमगड तालुक्यातील कुंर्झे येथील मिलिंद गायकवाड यांच्या पोल्ट्रीत शुक्रवारी एकाच दिवशी सरासरी पावणे दोन ते दोन किलो वजनाच्या 672 कोंबड्या मरण पावल्या आहेत. याच पोल्ट्री शेजारी असलेल्या भरत शेलार यांच्या पोल्ट्रीतील दीड किलो वजनाच्या 237 कोंबड्या मरण पावल्या आहेत.

दरम्यान विद्युत वितरण कंपनीने शुक्रवारी संपूर्ण दिवस विद्युत पुरवठा खंडीत केला होता. विद्युत पुरवठा नसल्याने उष्णता कमी करण्यासाठी पोल्ट्री फार्ममध्ये लावलेले पंखे बंद राहिले. तसेच कोंबड्यांना थंडावा निर्माण करण्यासाठी असलेल पाण्याचे फवारेही विजेअभावी बंद असल्याने कोंबड्या मरण पावल्या. असे मिलिंद गायकवाड यांनी सांगितले. गायकवाड व भरत शेलार या दोन्ही सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी कर्ज घेऊन पोल्ट्री व्यवसाय सुरु केला आहे. मात्र आता नुकसान भरपाई कशी होणार या विवंचनेत ते अडकले आहेत.