अनैतिक संबधाबाबत सांगण्याची धमकी दिल्याने तरुणाचा खून, 14 महिन्यानंतर उकलले ‘गुढ’

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – गेल्या 14 महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या अमंळनेर येथील एका 29 वर्षीय युवकाचा मृतदेह गंगापूर पोलिसांनी शनिवारी रात्री जेसीबीच्या साह्याने उकरून काढला. अनैतिक संबंधातून मृत तरुणाचा खून झाल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. या प्रकरणी गंगापूर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

गणेश दामोदर मिसाळ (वय 29, रा. अंमळनेर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी सचिन ज्ञानेश्वर पंडित, आणि रवींद्र उर्फ पप्पू कारभारी बुट्टे (दोघेही रा.अंमळनेर, ता.गंगापूर) या दोघांना अटक केली आहे.

याबाबत गंगापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत गणेश मिसाळ हा 5 ऑक्टोबर 2019 पासून बेपत्ता होता. याबाबत त्याच्या कुटूंबियांनी 5 दिवस सर्वत्र शोध घेऊनही गणेश सापडला नसल्याने, 10 ऑक्टोबर 2019 रोजी गंगापूर पोलीसात तो बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. तेव्हापासून या प्रकरणाचा तपास सुरूच होता. दरम्यान, पोलिसांनी सचिन ज्ञानेश्वर पंडित, आणि रवींद्र उर्फ पप्पू कारभारी बुट्टे (दोघेही रा.अंमळनेर, ता.गंगापूर) यांना ताब्यात घेतले. तपासात सचिनचे गावातील एक महिलेसोबत अनैतिक संबंध होते आणि मयत गणेश याला अनैतिक संबंधाची माहिती होती, तसेच तो हे संबंध उघड करण्याची धमकी देत होता. या कारणावरून आरोपींने कट रचून त्याचे अपहरण केले आणि दोरीने गळा आवळून खून केला आणि प्रेत अंमळनेर शिवारातील पांडुरंग गाडे यांच्या शेतात पुरून टाकले होते, अशी माहिती समोर आली. त्यानुसार दोघा आरोपींविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद मुंढे, पोहेकॉ. कैलास निंभोरकर, विजय भिल्ल, पोलीस नाईक संदीप डमाळे, गणेश खंडागळे, सोमनाथ मुरकूटे, लक्ष्मण पुरी, मनोज बेडवाल, गणेश लिपणे, दत्तात्रय गुंजाळ आदींचा या संपूर्ण कारवाईत समावेश होता. गंगापूर पोलिसांनी या प्रकरणी तंत्रशुद्ध व कौशल्यपूर्ण तपास केल्याने आणि गुन्हाच्या छडा लावल्याने पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी तपास पथकाला 15 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.