तीन जवान शहीद; १३ अतिरेक्यांचा खात्मा

श्रीनगर: वृत्तसंस्था
दक्षिण काश्मीरमध्ये सुरक्षा दल आणि अतिरेक्यांदरम्यान काल झालेल्या चकमकीत तीन जवान शहीद झाले आहेत. या चकमकीत दोन नागरिकही ठार झाले असून १३ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात लष्कराला यश मिळाले, अशी माहिती जम्मू-काश्मीरचे पोलीस महासंचालक एस.पी. वैद्य यांनी दिली.

दक्षिण काश्मीरमध्ये आज सकाळपासून तीन वेगवेगळ्या ठिकाणी सुरक्षा दलाची अतिरेक्यांबरोबर चकमक उडाली. त्यात लष्कर आणि सीआरपीएफचे अनेक जवान जखमी झाले आहेत. दोन ठिकाणी सुरू असलेलं एन्काऊंटर संपले असून एका ठिकाणी एन्काऊंटर सुरू असल्याचे एस. पी. वैद्य यांनी सांगितले. अनंतनागमध्ये तर अतिरेक्यांना शरणागती पत्करण्यास सांगितले होते. अतिरेक्यांच्या कुटुंबीयांनीही त्यांना तसं आवाहन केले होते, मात्र या अतिरेक्यांनी ऐकले नाही. त्यामुळे लष्कराला चकमक सुरूच ठेवावी लागल्याने या चकमकीत १३ अतिरेकी ठार झाले असून एका अतिरेक्याने शरणागती पत्करल्याचे वैद्य यांनी सांगितले. अनंतनागमध्ये एका अतिरेक्याला पकडण्यात यश आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, दक्षिण काश्मीरमधील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर फुटीरतावाद्यांनी दोन दिवसाच्या काश्मीर बंदची हाक दिली आहे. जेआरएल या फुटीरतावादी संघटनेने आज आणि उद्या बंद पुकारला आहे. तसेच लोकांना कामधंदा सोडून सायंकाळी निघणाऱ्या ‘जनाजे की नमाज’मध्ये भाग घेण्याचं आवाहनही केले आहे.

दरम्यान, आज सकाळी अनंतनाग आणि शोपियानमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एकूण १३ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं. तर एकाला जिवंत पकडले आहे. तो हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी असल्याचे सांगण्यात येत आहे.

अनंतनाग आणि शोपियानमध्ये दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यानंतर लष्कर, सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी अनंतनागमध्ये शोध मोहीम सुरू केली. जम्मू-काश्मीरचे पोलीस महासंचालक एस. पी. वैद यांनी सांगितले, की ‘अनंतनागमधील डायलगाममध्ये एक दहशतवादी मारला गेला. एकाला जिवंत पकडण्यात आले आहे. मृत दहशतवादी स्थानिक होता आणि पोलीस आणि त्याच्या कुटुंबीयांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र तो शरण आला नाही.’ तसेच शोपियानमध्ये दोन ठिकाणी चकमकी झाल्या. त्यात १३ दहशतवादी मारले गेले. त्यात अनेक दहशतवादी संघटनांचे म्होरके आहेत. द्रागडमध्ये कंठस्नान घातलेल्या दहशतवाद्यांकडे मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा होता. तो हस्तगत करण्यात आला आहे.

शोपियानमधील काचदोरामध्ये अद्यापही चकमक सुरूच आहे. तेथे चार ते पाच दहशतवादी लपून बसले आहेत. तसंच काही नागरिकही अडकले आहेत. त्यांना वाचवण्याचा प्रयत्न सुरू असून सुरक्षा दलाकडून शोधमोहीम सुरूच आहे.